नायगावात संचारबंदीचे नियम धाब्यावर

naygav.jpg
naygav.jpg


नायगाव, (जि.नांदेड) ः लॉकडाउन व संचारबंदीत नागरिकांनी घराच्या बाहेर न पडण्याबद्दल वारंवार विनंती व आवाहन करून सुद्धा नियम मोडून नागरिक बिनधास्तपणे नायगाव शहरात मोठी गर्दी करत आहेत. या गर्दीला रोखण्यासाठी पोलिस यंत्रणाही अपयशी पडल्याने लॉकडाउनच्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे.

देशात व राज्यात कोरोनाचे वाढणारे संक्रमण पाहता शासनाने तीन आठवडे संचारबंदी लागू करून लॉकडाउन केले. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. मात्र, राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे संसर्ग होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. पण नागरिकांना मात्र जगात थैमान घातलेल्या कोरोनाचे गांभीर्य वाटेनासे झाले आहे.


नागरिकांना कशाचेही गांभीर्य नाही 
घराबाहेर न पडण्याबरोबरच सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्याची विनंतीही करण्यात येत आहे. पण संचारबंदी व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिक शहरासह ग्रामीण भागात मोकाट फिरत आहेत. शासन वारंवार विनंती व आवाहन करत असताना आजही नागरिक सर्व नियम मोडून रस्त्यावर फिरत असताना दिसत आहेत. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना कशाचेही गांभीर्य नसले तरी या बिनकामी रस्त्यावर फिरणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात मात्र, नायगाव पोलिसांना यश येत नाही.


शहरातील गर्दी पाहता संचारबंदी उठली असल्याचे दिसून येत होते
मंगळवारी व बुधवारी तर नायगाव शहरातील गर्दी पाहता संचारबंदी उठली असल्याचे दिसून येत होते. कारण जनधन खात्यात केंद्र सरकारने टाकलेली रक्कम उचलण्यासाठी महिलांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर किराणा, औषधी दुकानांसमोरील गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंग कशाला म्हणतात, असा प्रश्न पडल्याशिवाय राहीत नाही. एवढेच नव्हे तर पोलिस ठाण्याच्या समोरच खासगी केंद्रांवर जनधन खात्यांतील रक्कम उचलण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी ठाण्यात जाणारे येणारे पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी पाहत होते; पण एवढी गर्दी का झाली हे पाहण्याची तसदी कुणीच घेतली नाही. त्यामुळे संचारबंदी, लॉकडाउन व सोशल डिस्टन्सिंगचे पोलिसांना काहीच सोयरसुतक नाही, असे वाटते. या उद्‍भवलेली गंभीर परिस्थितीचे काही नागरिकांना गांभीर्य नाही, पण त्याची जाणीव करून देणे संबंधित यंत्रणेचे काम असतानाही यंत्रणा दुसऱ्याच कामात व्यस्त असल्याने नायगाव हे कोरोनाचे उगमस्थान होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. या बाबत जिल्हा स्तरावरून वरिष्ठांनी आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com