शीख भाविक लॉकडाउनमध्ये का झाले त्रस्त...? वाचा सविस्तर

file photo
file photo

नांदेड : नांदेडच्या गुरूद्वारामध्ये जवळपास एक महिन्यांपासून लॉकडाउनमध्ये असलेल्या शीख भाविकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गृहमंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला निर्देश पाठविल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्रीमती हरसिमरतकौर बादल यांनी रविवार (ता. १९) सोशल मीडिया वर वीडियोद्वारे दिली होती. वरील वीडियोमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला होता.

सोमवारपासून आपली घरवापसी आहे असे गृहीत धरुन त्यांनी तयारी सुरु केली होती. परंतु शासनाने वरील विषयी मौन धारण केल्याने भाविकांची घोर निराशा झाली आहे. केन्द्राने परवानगी दिल्यानंतर आता भाविकांचा घोडा कुठे अडला ? असा प्रश्न शीख समाजातुन विचारला जात आहे. 

भाविक पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान येथील

नांदेडमध्ये लॉकडाउन घोषणेनंतर हजारोंच्या संख्येत भाविक अडकून पडले. ता. २० मार्च रोजी आलेले नरेन्द्र मोहन आणि त्यांची पत्नी हरजीतकौर हे वरील निर्णयामुळे बेजार झाले आहेत. त्यांची आठ वर्षाची मुलगी आजारी आहे, व दिल्ली येथील दवाखान्यात उपचाराधीन आहे. अनेक भाविक पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान येथील आहेत. ज्यांचे कुटुंब आणि शेती उघड्यावर आहे. वृद्धांच्या प्रकृतीचा प्रश्न आहे. संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा सचखंड बोर्ड अध्यक्ष, बोर्डाचे सदस्य, सेवाभावी नागरिक, पत्रकार रवीन्द्र सिंघ मोदी यांनी भाविकांचा मुद्दा वेळोवेळी प्रस्तुत केला. पंजाब येथून नेते मंडळीनी हा मुद्दा केंद्रापुढे नेला. भाविकांना त्यांच्या घरी पाठविण्याविषयीचा सोमवारी मार्गी लागणार असे चित्र निर्माण झाले होते.

भाविकांचा घोडा नेमका कुठं अडला ?

परिवहन मंडळानेही विशेष गाड्या सोडण्याची तयारी दाखवली असल्याने सर्व भाविक सुखरूप घरी परतणार असे सर्वाना वाटत होते. पण महाराष्ट्र शासन आणि विशेष करून जिल्हा प्रशासनाने आज मौन धारण करून घेतले. मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आल्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासन पुढील करवाई करेल असे समजले. केंद्राने आदेश दिल्याचे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल हे बतावणी करीत आहेत काय? जर त्यांच म्हणणं खरं असेल तर मग भाविकांचा घोडा नेमका कुठं अडला हे प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे.

प्रयत्न सुरु आहेत : चव्हाण
 
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भाविकांना घरी पाठविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हंटले आहे. पत्रकार रवीन्द्रसिंघ मोदी यांच्याशी फ़ोनवर झालेल्या संभाषणात श्री चव्हाण यांनी आश्वासन दिले की शासन लवकरच या विषयी तोडगा काढेल. आम्ही प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com