हेलपाटे मारून मिळालेले सौर कृषीपंप बंद 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

गेवराई (जि. बीड) -  वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, बिघाड यावर पर्याय म्हणून तत्कालीन महायुती सरकारने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेला महावितरण आणि कंत्राटदार कंपन्यांनी चांगलेच ग्रहण लावले आहे. दोघांमधील घोळ शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. महावितरण अधिकारी कंपन्यांची अडवणूक करीत आहेत. तर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दर्जाहीन कृषीपंप साहित्य दिले जात असल्याचे समोर येत आहे. 

सीआरआय कंपनीचे बसविलेला पंप बंद असल्याचा आरोप अर्धमसला येथील शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, महावितरण कंपनी आणि कंत्राटदार कंपन्यांच्या घोळात अद्यापही साधारण एक हजार शेतकरी कृषीपंपांच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यातील समस्यांतून मुक्त करण्याच्या हेतूने महायुती सरकारने मुख्यमंत्री सौर कृषीपंप ही योजना आणली. शेतकऱ्यांनी ऑनलाइन रकमा भरल्यानंतर सरकारच्या हिश्‍श्‍याच्या रकमेनंतर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना सौर कृषीपंप बसवून दिले जाणार होते. दरम्यान, जिल्ह्यात 1400 शेतकऱ्यांनी आपल्या हिश्‍शाची 38 हजार 500 (सुरवातीला) रक्कम भरली.

त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांचा स्वहिश्‍श्‍याची रक्कम कमी करून 25 हजार रुपये एवढी केली. शेतकऱ्यांनी आपल्या रकमा भरून वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांना अद्याप याची प्रतीक्षाच आहे. कंत्राटदार कंपन्यांची महावितरणचे स्थानिक अधिकारी अडवणूक करीत असल्याने त्यांच्याकडून पंप बसविण्यास दिरंगाई होत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे भरून वर्ष उलटले तरी त्यांना कृषीपंपासाठी वाट पाहावी लागत आहे. एकूणच महावितरण व कंत्राटदार कंपन्यांतील घोळ शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे.

दरम्यान, आता कृषीपंप बसविण्यास सुरवात झाली असली, तरी कंपन्यांकडून दर्जाहीन साहित्य बसविले जात असल्याचे समोर आले आहे. 
तालुक्‍यातील अर्धमसला येथील शेतकरी काशीनाथ जाधव यांनी एका कंपनीच्या कृषीपंपाची निवड केली होती; परंतु त्यांना बसविलेला पंप लागलीच बंद पडला आहे. त्यांनी यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीकडे विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. हे समोर आलेले उदाहरण असले तरी बहुतेक शेतकऱ्यांच्या अशाच तक्रारी आहेत. तर अद्यापही एक हजार शेतकरी कृषीपंपांची वर्षापासून वाट पाहत आहेत. 

योजनेत आपण एका कंपनीचा पंप निवड केली. आपल्या विहिरीवर बसविलेला पंप दर्जाहीन असल्याने पाणी फेकत नाही. या पंपाचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. 
- काशीनाथ जाधव, शेतकरी, अर्धमसला, ता. गेवराई 
 

आपण वर्षापूर्वी स्वहिश्‍श्‍याची रक्कम भरली आहे. अद्याप आपणाला कंपनीने सौर कृषीपंप बसविला नाही. आता हंगामात पाणी भेटणार नसेल तर या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा? महावितरण कंपनी व कंत्राटदार कंपन्यांच्या घोळात शेतकरी भरडला जात आहे. 
- सुरेंद्र पवार, शेतकरी, विडा, ता. केज 

ज्या शेतकऱ्यांना सीआरआय कंपनीकडून बोगस साहित्य भेटले आहे व पंप पाणी कमी मारत आहे अशा शेतकऱ्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार करावी. संबंधित कंपनीवर योग्य कारवाही केली जाईल व वरिष्ठांना माहिती देऊन या कंपनीचे बिले रोखण्यात येतील. 
- बी. एन. शिवलकर, उपमुख्य कार्यकारी अभियंता, गेवराई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com