बदनापूरच्या सोमठाणा प्रकल्पात जेमतेम पाणी 

सोमठाणा (ता. बदनापूर) येथील अपर दुधना मध्यम प्रकल्पात शिल्लक असलेला जलसाठा. 
सोमठाणा (ता. बदनापूर) येथील अपर दुधना मध्यम प्रकल्पात शिल्लक असलेला जलसाठा. 

बदनापूर (जि.जालना)- सातत्याने कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बदनापूर तालुक्‍याला परतीच्या पावसाने कसेबसे तारले. मात्र, बदनापूर शहरासह अन्य पंधरा गावांच्या पाणीपुरवठ्याची दारोमदार असलेल्या सोमठाणा येथील अपर दुधना मध्यम प्रकल्पात अवघा 19.82 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात साधारण एप्रिल महिन्यापासून पुन्हा सोमठाणा प्रकल्पावर आधारित गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. 

बदनापूर तालुका आणि कोरडा दुष्काळ असे साधारण तीन वर्षांपासून जणू समीकरणच बनले आहे. मागच्या वर्षी पावसाळी हंगाम कोरडा गेला. त्यात खरीप पिके हातची गेली होती. शिवाय जलस्रोत आटल्याने रब्बी पिकांसह टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

अर्थात, अवघा पावसाळा संपल्यानंतर भर दिवाळीत अवकाळी पावसाने थैमान मांडले. यात कशीबशी तगलेली पिकेही उद्‌ध्वस्त झाली. मात्र नदी, नाले वाहू लागली आणि कोरड्याठाक पडलेल्या प्रकल्पात पाणी साठले. तालुक्‍यातील राजेवाडी साठवण तलाव व आन्वीचा लघुसिंचन प्रकल्प ओसंडून वाहिले. वाल्हा येथील सिंचन प्रकल्पात देखील मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला होता. मात्र, तालुक्‍यातील सर्वांत मोठा सोमठाणा येथील दुधना अपर मध्यम प्रकल्पात मात्र इतर धरणांच्या तुलनेत कमी म्हणजे 30 टक्केच जलसाठा निर्माण झाला होता.

सोमठाणा  मध्यम प्रकल्पावर बदनापूर शहरासह सोमठाणा, बाजार गेवराई, दुधनवाडी, गोकुळवाडी, ढवळापुरी आदी 15 गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे परतीच्या पावसाने सोमठाणा प्रकल्पावर आधारित गावांना मोठा दिलासा मिळाला. मात्र सद्यःपरिस्थितीत सोमठाणा प्रकल्पात केवळ 19.82 टक्‍के जलसाठा शिल्लक आहे.

उन्हाळ्यात पाण्याचा होणारा अधिक वापर आणि वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यातून धरणात उरलेले पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत टिकेल याची कोणतीच शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या शेवटच्या चरणात सोमठाणा प्रकल्पावर आधारित गावांना पुन्हा टंचाईचा सामना करावा लागू शकतो. 

टंचाई आराखडा मंजुरीसाठी 

प्रशासनाला देखील आगामी टंचाईच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे पंचायत समितीने दोन कोटी 31 लाख रुपयांचा टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. समाधानाची बाब म्हणजे टंचाईग्रस्त गावांना सुरू होणाऱ्या टॅंकरसाठी यंदा तालुक्‍यातील प्रकल्पातून पाणी मिळणार आहे. मागच्या वर्षी टॅंकर भरण्यासाठी पाण्याचा शोध घेण्याची वेळ प्रशासनावर आली होती. 

बदनापूर तालुक्‍यात परतीच्या पावसामुळे टंचाईचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे. अर्थात, उन्हाळ्यात टंचाईच्या परिस्थितीवर आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 
- नारायण कुचे 
आमदार, बदनापूर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com