कारखाने उस्मानाबादमध्ये; वर्चस्व पश्चिम महाराष्ट्राचे 

00Sugar actory_0.jpg
00Sugar actory_0.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यामधील साखर कारखाने वाढले असून, ते आता पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांच्या ताब्यात गेले आहेत. जिल्ह्यातील काही भूमिपुत्रही कारखानदारीमध्ये पुढे येत असले तरी दुसऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील तसेच बारामती अशा विविध ठिकाणांहून कारखानदार येऊन जिल्ह्यामध्ये जम बसविताना दिसत आहेत. 

जिल्ह्यामध्ये कारखान्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यामध्ये अधिक कारखाने असणारा जिल्हा म्हणून उस्मानाबादची नवी ओळख होत आहे. कारखानदारांनी जिल्ह्यामध्ये शिरकाव करीत ऊस उत्पादकांची विश्वास संपादन केल्याचे चित्र आहे. यामध्ये भाऊसाहेब बिराजदार कारखाना आणि बानगंगा हे दोन्ही कारखाने बारामतीच्या उद्योजकांनी चालविण्यास घेतले आहेत. या शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील आमदार प्रा. तानाजी सावंत, पंढरपूरचे उद्योजक अभिजित पाटील, दिलीप माने, रोहन देशमुख यांचेही कारखाने जिल्ह्यात आहेत. या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला पर्यायदेखील उपलब्ध होत असून, जिल्ह्याच्या अर्थकारणावरही त्याचा चांगला परिणाम होत आहे.

जिल्ह्याची इतर कोणत्याही उद्योगामध्ये भरभराट होत नसताना साखर कारखान्याच्या माध्यमातून तरी रोजगाराची संधी मिळत आहे. मधल्या काळात कारखाना उद्योगात मरगळ आलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस घालण्यासाठी पर्याय उपलब्ध होत नव्हते. मात्र, यावेळी उसाचे क्षेत्र कमी व कारखान्याची संख्या मोठी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळून वेळेत ऊसदेखील गाळप होण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत. पुढील वर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, त्यावेळी खऱ्या अर्थाने वाढलेल्या कारखान्याचा फायदा दोन्ही घटकांना होईल असा अंदाज या क्षेत्रातील मंडळींकडून व्यक्त होत आहे. 

काही भूमिपुत्रांनी आदर्शवत कामगिरी 
जिल्ह्यातील कारखाने भूमिपुत्रांकडून इतर जिल्ह्यातील उद्योजकाकडे जात असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, काही उद्योजकांनी नवीन कारखाने काढलेले आहेत. काहींनी येथील कारखाने विकत व भाड्याने घेतल्याचे दिसून येत आहेत. मधल्या काळात उसाचे क्षेत्र अधिक होते तर कारखान्याची संख्या कमी झाली होती. यावेळी शेतकऱ्यांवर काही प्रमाणात कारखान्याच्या मनमानी कारभारामुळे अन्याय होत असल्याची स्थित होती. जिल्ह्यातील काही भूमिपुत्रांनी आदर्शवत कामगिरी करीत आपल्या कारखान्याच्या माध्यमातून आजवर अत्यंत चांगला लौकिक मिळविला. त्यात सहकारी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी कारखान्याने तर अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. शिवाय विठ्ठलसाई कारखान्याकडूनही त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com