छुप्या मार्गांनी आले अन् झाले क्वारंटाइन : वाचा कुठे?

file photo
file photo

परभणी : कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असल्या तरी चोरट्या मार्गाने एक-दोन नाही, तर तब्बल एक हजार ५३८ लोक परभणी जिल्ह्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, याची माहिती मिळताच प्रशासनाच्या तत्परतेने या सगळ्यांना त्या-त्या ठिकाणी क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे.
कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे जिल्ह्यात सीमा बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भात आदेश काढून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यासाठी तब्बल १४ पॉईंट लावण्यात आले आहेत. या १४ पॉईंटवर पोलिसांचा फौजफाट तैनात आहे. असे असतानाही पुणे, मुंबई, औरंगाबाद, बीड या चार जिल्ह्यांतून हजारो लोक परभणी जिल्ह्यात प्रवेशीत झाले आहेत. सीमेवरील पॉईंटवर पोलिस असल्याकारणाने हे लोक चोरट्या मार्गांनी व गैरमार्गांनी जिल्ह्यात आले आहेत. असे तब्बल एक हजार ५३८ लोक जिल्ह्यात आले आहेत. पुणे, मुंबई पाठोपाठ औरंगाबाद शहरही कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असल्याने या ठिकाणांहून येणाऱ्या लोकांवर प्रशासनाची करडी नजर आहे. 

कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ
नुकत्याच पुणे येथून आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशा परिस्थिती हे लोक आले कसे, याचा शोध घेत बसण्यापेक्षा आलेल्या सर्व लोकांना सरळ क्वारंटाइन करण्यात आले आहे. यात मुंबई येथून ५०, औरंगाबाद येथून १७४, बीड जिल्ह्यातून १६२, तर पुणे येथून तब्बल ३२२ लोक गैरमार्गांनी परभणी आले आहेत. या सर्वांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आले आहेत.

हेही वाचा व पहा - व्हिडिओ : कोरोनाच्या लढ्यासाठी योग, आयुर्वेदाचा सुरेख संगम

सीमेलगच्या तब्बल ८३ गावांचा सर्व्हे
छुप्या मार्गाने येणाऱ्या लोकांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या सीमेस लागून असलेल्या गावांचा सर्व्हे करण्यात आला. परभणी जिल्ह्यास बीड, जालना, लातूर, हिंगोली, नांदेडच्या सीमेलगत एकूण ८३ गावे आहेत. सीमेलगत सर्व ८३ गावांचे पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व गावातील प्रमुख व्यक्तीचे संपर्क नंबर घेऊन व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यांना आशा सीमेवरील गावांमधून बाहेर जिल्ह्यातून नागरिकांनी प्रवेश केल्यास पोलिस पाटील व महसूल प्रशासनास कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा - रस्त्यावर उतरून सेवा देणारा हरहुन्नरी क्रीडा शिक्षक


७६६ जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जमावबंदी आदेश लागू असून ता. २२ एप्रिल रोजी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ३० आरोपींविरुद्ध १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकूण २८२ गुन्हे दाखल असून ७६६ आरोपींवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात आली आहे. ता. २२ एप्रिल रोजी विनाकारण फिरणाऱ्या ५२ वाहने जप्त केली आहेत. आतापर्यंत १०८२ दुचाकी व ३९ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

कायदेशीर कारवाई 
सीमेवरून जिल्ह्यात प्रवेशाबाबत कुठल्याही प्रकारे सूट देण्यात आलेली नाही. नागरिकांनी याचा दुरूपयोग अगर वेगळा अर्थ घेऊन इतर छुप्या मार्गाने परभणी जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आश्रय देऊ नये. असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधीक्षक, परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com