Chandrakant Patil
Chandrakant Patil

उद्धव ठाकरे यांचे घाबरट सरकार, भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

लातूर : मराठा आरक्षण असो किंवा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो यावर चर्चा न करता पळ काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा आहे. हे सरकार अत्यंत घाबरट आहे. या सरकारचे जे मार्गदर्शक आहेत, ते मात्र मजा घेत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता.१०) येथे केली. लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्यांतील पक्षाच्या आढावा बैठकीसाठी श्री.पाटील येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  माजी तथा मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार सुधाकर भालेराव, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे आदी उपस्थित होते.


कोरोनामुळे बाहेर फिरता आले नाही. तरी देखील आम्ही ऑनलाईन बैठका घेत होतो. आंदोलनही केली. आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे एका एका ठिकाणी चार-पाच जिल्ह्याच्या बैठका घेण्यात येत आहेत. राज्यात ७० हजार कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. राज्यात पक्ष बळकटीवर भर देण्यात येत आहे, असे ते म्हणाले. राज्यात अकृत्रिम पद्धतीने तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने राज्याची वाट लावली आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्याला पुरेशी मदत दिली नाही.

सत्तेत नसताना उद्धव ठाकरे हे हेक्टरी २५ हजार तर बागायत शेतीसाठी हेक्टरी ५० हजाराची मदतीची मागणी करीत होते. आता त्यांनी सत्तावर असताना हेक्टरी दहा हजार व बागायती शेतीसाठी केवळ २५ हजारांची मदत जाहिर केली. ही अपुरी मदत दिवाळीपूर्वी मिळेल असे सांगितले होते. पण सध्या तरी शक्य वाटत नाही. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरु असल्याने प्रशासन संभ्रमात आहे. पण आपत्तीची मदत देता येवू शकते. पण त्यांची मानसिकताच नाही, असे ते म्हणाले. या सरकारला बंगल्याची दुरुस्ती करणे, गाड्या खरेदीसाठी पैसा आहे. पण शेतकऱ्यांना मदत करायला पैसा नाही. एसटी कर्मचाऱ्याने तर ठाकरे सरकराच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. आता सरकारवर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हातावर पोट असणाऱ्यांना एक दमडीही या सरकारने दिली नाही, असे श्री. पाटील म्हणाले.

आमच्या दृष्टीने एकनाथ खडसे हा विषय संपला आहे, असे सांगून सरकारकडून नागपूरचे अधिवेशन रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. मुंबईत किमान पंधरा दिवसाचे हे अधिवेशन घ्यावे अशी आमची मागणी आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार गंभीर नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे सरकार चर्चाच करायला तयार नाही. अत्यंत घाबरट सरकार आहे. सरकारची संवेदनशीलता संपली आहे. या सरकारचे मार्गदर्शन हे मजा पाहत आहेत, असे श्री. पाटील म्हणाले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. ते विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com