लातूर, ता. २१ ः शहर व जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी शनिवारी (ता.२०) झालेल्या अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी झालेल्या गारपिटीचा फटका फळ बागासह शेतीला बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. यातच शनिवारी सकाळपासूनच शहर व ग्रामीण भागासह जिल्हाभरात ढग दाटून आले. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले व लातूर शहरासह ग्रामिण मधील खोपेगाव, गंगापूर, चिखलठाणा, रामेश्वर, खंडापूर, सेलू बुद्रूक तसेच निलंगा तालुक्यातील कासार सिरसी, हासोरी, दगडवाडी, औसा तालुक्यातील किल्लारीसह परिसरात ज्वारीसह द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागामध्ये गारांचा पाऊस देखील झाला आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघातील लातूर, रेणापूर सोबतच औसा तालुका व लातूर
जिल्ह्यातच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी या पिकांबरोबरच आंबा, द्राक्ष फळबागा व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय काही ठिकाणी वीज पडून पशुधन दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी शेकडो क्षेत्रावरील शेतपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्याबद्दल माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असताना त्यातच शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान क्षेत्रात आता वाढ झाली आहे. त्यामुळे याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.