
कोरोनाबाधित रुग्णाचे १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्ण कोरोनामुक्त झाला असून शुक्रवारी (ता.१७) रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत घरी सोडले.
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलशेन वार्डात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचे १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्ण कोरोनामुक्त झाला असून शुक्रवारी (ता.१७) रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत घरी सोडले.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मार्च (ता.३१) कोविड रुग्णासाठी तयार करण्यात आलेल्या आयसोलशेन वार्डात हा रुग्ण दाखल झाला होता. त्याचा स्वॅब अहवाल औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता.
हेही वाचा - लॉकडाऊन : चक्क नवरीलाच नवरदेवाने आणले दुचाकीवरून घरी
कोरोनाबाधित पहिला रुग्ण
(ता.दोन) एप्रिलला प्राप्त झालेला अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळल्याने प्रशासन हादरले. त्यानंतर रुग्ण राहात असलेला परिसर कंटनमेंट झोन व बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता. त्यांनतर उपविभागीय अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्या मदतीने या झोनमध्ये लक्ष ठेवण्यात आले होते.
१४ दिवस तज्ज्ञांच्या देखरेखी
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात १४ दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कोरोनाबाधित रुग्णास ठेवण्यात आले होते. १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर घेण्यात येणारे दोन्ही थ्रोट स्वॅब नमुन्यांचा अहवाल औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविला होता.
कोरोनामुक्त रुग्णास घरी सोडले
घेण्यात आलेले दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन्ही नमुन्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी (ता.१७) कोरोनामुक्त झालेल्या रुग्णास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोरोनाशी यशस्वी लढा देणाऱ्या रुग्णाचे डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
परिश्रमाचे झाले चिज
या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, डॉ. गोपाल कदम, डॉ. भालेराव आदींची उपस्थिती होती. डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसह प्रशासनाच्या परिश्रमाचे चिज झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
तत्काळ उपाययोजना घेतल्या हाती
दरम्यान, कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या.
येथे क्लिक करा - हिंगोलीत पाच रेशन दुकानदारांवर कारवाई
चौदा दिवस उपचार
जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. नारायण भालेराव यांच्या पथकाने कोरोनाबाधित रुग्णावर चौदा दिवस उपचार केले. दिवसभरातून किमान आठ ते दहा वेळेस रुग्णाची तपासणी करण्यात आली.
पुष्पगुच्छ देऊन सत्कार
खबरदारी म्हणून मेट्रो सिटीतून परत आलेल्या गावकऱ्यांच्या नोंदी घेत शहरी भागासह ग्रामीण भागात व्हीआरआरटी पथकामार्फत आरोग्य तपासणी सुरू केली. निर्जंतुकीकरण फवारण्या करण्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळेच कोरोनाबाधित रुग्णास वेळीच उपचार मिळाले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाला. शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास, डॉ. कदम, डॉ. भालेराव आदींनी कोरोनामुक्त रुग्णाला पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.