सावधान : नांदेडकरांनो पोलिसांचे ऐका, कायद्याच्या कचाट्यात सापडू नका- दत्ताराम राठोड

फोटो
फोटो

नांदेड : जगात थैमान घातलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासन मागील पंधरा दिवसापासून रस्त्यावर आहेत. त्यांच्या आवाहनाला नांदोडकरांनो प्रतिसाद देत घरातच थांबा, कायद्याच्या कचाट्यात सापडू नका असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी केले आहे. पोलिसांनी आवाहन करुनही पुन्हा लॉकडाऊनचे आदेश धुडकावणाऱ्या १३ जणांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १३ जणांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भविष्यातही संचारबंदीचे आदेश धुडकावून लावणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा पोलिस अधीक्षकांसह अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी दिला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखा

देशासह राज्यातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ता. २२ मार्च रोजी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू केले होते. संचारबंदीचे आदेश लागू असल्याने महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असताना संचारबंदी आदेश धुडकावत घराबाहेर पडलेल्या १३ जणाविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात वजिराबाद तीन, शिवाजीनगर एक, विमानतळ एक, ग्रामीण पोलिस ठाणे दोन, भाग्यनगर दोन, कुंडलवाडी एक, देगलुर एक आणि मुखेड तालुक्यात एक अशा १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आजपर्यंत १०० जणांवर गुन्हे दाखल

दरम्यान यापूर्वी ता. २२ मार्च रोजीचा जनता कर्फ्यू मोडणाऱ्या १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ता. २३ मार्च रोजी संचारबंदीचे आदेश धुडकावणाऱ्या १० जणांविरूद्ध, ता. २४ मार्च रोजी १८ जणांविरुद्ध तर २५ मार्च रोजी सात जणांविरुद्ध अशा एकूण ५५ जणांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भविष्यातही संचारबंदीचे आदेश धुडकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या लॉकडाउनचा भंग करणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. असा इशाराही देण्यात आला आहे. 

संचारबंदीचे उल्लंघन करु नका

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाचा कारावास आणि रोख रक्कमेचा दंड ठोठावला जाऊ शकतो. त्यामुळे सुजाण नागरिकांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेल्या लॉक डाऊनला पूर्णपणे सहकार्य करावे. पोलिस, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com