शासनापेक्षा शाळा अवजड होतात तेव्हा...काय हेते ते वाचाच

File photo
File photo

नांदेड : ‘मागेल त्याला शाळा’ या शासनाच्या धोरणामुळे गल्लीबोळांमध्ये शाळांचे पीक बहरले आहे. परिणामी याच शाळा आता शिक्षण विभागाला डोईजड झाल्या आहेत. शासनापेक्षा शाळा अवजड झाल्या, असे म्हणण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे.

जानापुरी (ता.लोहा, जि. नांदेड) येथील जवान संभाजी कदम दोन वर्षांपूव्री शहीद झाले. त्यांच्या सहावर्षीय मुलीच्या शाळा प्रवेशासाठी वीरपत्नी शीतल कदम शहरातील ग्यानमता शाळेमध्ये गेल्या. परंतु, त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावरच अडवून आतमध्ये सोडले नाही. प्राचार्यांनी अपमानास्पद वागणूक मिळाल्याने ‘याचसाठी माझ्या पतीने बलिदान दिले का?’ असे म्हणत संताप व्यक्त केला.

प्रवेश न घेण्याची परखड भूमिका
संतप्त झालेल्या वीरपत्नी शीतल कदम यांनी दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना निवेदन दिले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी ग्यानमाता शाळेचे प्राचार्यांना जाब विचारण्यासाठी कार्यालयामध्ये बोलावले. परंतु, जिल्हाधिकारी यांनी या प्राचार्यांना सन्मानाची वागणूक दिल्याने वीरपत्नी शीतल कदम पुन्हा संतप्त झाल्या. प्राचार्यांनी माझी माफी मागीतली असली, तरी मला या शाळेत मुलीला आता प्रवेश द्यायचा नाही, अशी परखड भूमिका घेतली आहे.

जाणूनबूजून डावलला प्रवेश
दरम्यान, या विभागाचे गटशिक्षणाधिकारी रुस्तम आडे यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना ग्यानमाता विद्याविहार शाळेची सखोल चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. त्यात म्हटले की, मी व वाजेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी शाळेला भेट दिली. त्यात वीरपत्नीला प्राचार्यांनी अपमानास्पद वागणून देवून उडवाउडवीची उत्तरे दिल्याची बाब समोर आलेली आहे. शिवाय पहिलीतून दुसरीत जाणारे विद्यार्थी १९४ आहेत. इतर सर्व वर्गांत दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या आहे. त्यामुळे २०२०-२०२१साठी दुसरी वर्गात प्रवेश देणे सहज शक्य असून, जाणूनबूजून वीर जवानाच्या मुलीला प्रवेशापासून डावलण्यात आले आहे.

ग्यानमाता शाळेचे चौकशी व्हावी
विशेष म्हणजे मुख्याध्यापकांच्या बैठकीत प्रवेशप्रक्रियेविषयी स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही त्याची अमलबजावणी न करता परस्पर ‘एलकेजी’ची प्रवेशप्रक्रिया सुरु केल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. जे की ही प्रवेशप्रक्रिया शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीस होणे अपेक्षित आहे; परंतु ग्यानमाता शाळेने ही प्रवेशप्रक्रिया जानेवारी २०२० मध्येच सुरु केलेली आहे. त्यामुळे या शाळेची सखोल चौकशी करून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे यांनी केलेली आहे.

नियमबाह्य प्रवेशप्रक्रिया
शाळेच्या मान्यतेबाबत रेकॉर्ड तपासण्यासाठी प्राचार्यांनी उपलब्ध करून दिले नाही. शाळेच्या आवारात शिक्षण विभागाला न कळविता एका छोट्याशा जागेत नोटीस लावून ‘एलकेजी’ची प्रवेशप्रक्रिया राबवून तीन दिवसांत अर्ज जमा करून घेतले. यावरून काही ठराविक व्यक्तिंनाच फॉर्म वितरित केल्याचे दिसते.
- रुस्तुम आडे, गटशिक्षणाधिकारी, नांदेड

प्रशासकीय कामात नेहमीच अडथळा
संबंधित शाळेला तीन दिवसात किती फॉर्म वितरित झाले व किती जमा झाले हे आम्हाला पाहण्यासाठी दिले नाही. हा आमचा मॅनेजमेंटचा भाग असल्याने आम्ही दाखवू शकत नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामात ग्यानमाता शाळा कधीच प्रतिसाद देत नाही.
- व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com