माणसाला खऱ्या सुखाचा शोध

happiness
happiness

तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेच्या शेवटी जे पसायदान मागितले; त्यात ‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात’ असे मागणे परमेश्वराकडे मागितले. नाहीतरी जगातल्या प्रत्येक माणसाला सुखी व्हायचे आहे. आता प्रत्येकाची जी काही इच्छा आहे ती जर पूर्ण होत असेल तर जगात दु;ख उरायला नको पण असे वास्तवात होत नाही. समर्थ आपल्याला जगी सर्व सुखी असा कोण आहे??? असे विचारतात ते उगाच नव्हे.

लोकमान्य टिळक म्हणतात; की आपण आपली एक इच्छा पूर्ण केली की इच्छा किंवा आकांक्षा अडीच पटीने वाढते.म्हणजे आपल्या इछापुर्तीतून सुख मिळतेच असे नाही.मिळाले तरी ते सदा सर्व काळ टिकेल असे होत नाही. सुप्रसिद्ध ब्रिटीश अर्थतज्ञ अंगस म्याडीसन यांनी जगातील काही प्रमुख अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला. त्यात भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि त्यातील आकडेवारी आपण समजून घेतली असता असे लक्षात येते की १८०० पर्यंत भारताचा उत्पादन दर (GDP) २७ % इतका होता. तर चीनचा उत्पादन दर हा देखील भारताच्या जवळपास होता. याचा अर्थ हे दोन्ही देश जगाच्या एकूण उत्पादनाच्या ५०% उत्पादन करीत होते.

भारतात ब्रिटीशराज कायम झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारताची जी लूट केली त्याचा परिणाम असा झाला की १९४७ मध्ये भारताचा उत्पादन दर १.४७ % इतका कमी झाला. मात्र उत्पादन दर अधिक असताना भारत अधिक सुखी होता असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. अलीकडे एखाद्या देशाचा विकास दर किंवा प्रगती मोजण्याचे मापदंड हे आर्थिक निकषांवर आधारीत आहेत. वर खाली होत जाणारा सेन्सेक्स आपल्या जीवाची घालमेल करतो. परंतु सेन्सेक्स फार वर गेला किंवा आपला उत्पादन दर चक्क आठ टक्यांच्या वर गेला म्हणून माणूस सुखी होतो का ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

माणसाचे सुख कशात आहे ? त्याच्या सुखाची कल्पना काय? त्याला आर्थिक सुबत्ता आली म्हणजे तो सुखी झाला का ? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे माणूस निरंतर शोधतो आहे. किंबहुना त्याचा सगळा आटापिटा हा सुखी होण्यासाठीच आहे. सिंगापूरचे दरडोई उत्पन्न हे ५६००० डॉलर इतके प्रचंड आहे. त्या मानाने कोस्तारीकाचे दरडोई उत्पन्न केवळ १४००० डॉलर इतके आहे. सिंगापूर हे राष्ट्र कोस्टारिका पेक्षा अधिक सुखी असायला हवे.मात्र अलीकडे केवळ आर्थिक उत्पन्नावरून तुमचा आनंद ठरत नसून त्याकरिता तज्ञांनी Global Happiness Index समोर आणलाय. GHI नुसार भलेही कोस्तारीकाचे दरडोई उत्पन्न हे सिंगापूर पेक्षा कमी असेल मात्र तो देश आणि तेथील माणसे सिंगापूर पेक्षा अधिक सुखी आहेत.

ग्रीस मधील तत्ववेत्ता एपीक्युरस आनंद हाच परमेश्वर असे म्हणतो. मृत्यनंतर कशाचेच अस्तित्व नसल्याने असलेले आयुष्य आनंदात घालवा असे तो म्हणायचा. आपल्याकडे देखील ‘यावत जीवेत सुखं जीवेत,ऋणं कृत्वा घृतं पिबेत’ म्हणणारा चार्वाक होऊन गेलाच की! संत चोखोबांना सुखाचे सुख हे चंद्रभागेच्या तीरी मिळाल्याचा आनंद आहे. हे सगळे सांगायचा उद्देश काय? तर सुखाचा शोध ही माणसाच्या आयुष्यातील निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

सुखाचा शोध प्रत्येकच माणूस आपआपल्या परीने घेत असतो. अलीकडच्या भाषेत सांगायचे तर कुठल्या तरी किकच्या शोधात आपण असतो. किक नावाचा एक चित्रपट मध्ये येऊन गेला. सलमानला त्यात अनेक धाडसी कामे करण्यात किक मिळते. मात्र शेवटी जेंव्हा गरजुना मदत करण्यात खरी किक आहे हे त्याच्या लक्षात येतं तेंव्हा त्याच्या जगण्याचा उद्देश बदलतो. भारतीय तत्वज्ञानानुसार आनंद आणि सुख ही मनाची अवस्था आहे. ती कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसून ती केवळ मनाच्या स्थितप्रज्ञ अवस्थेवर अवलंबून असते. पण ही स्थितप्रज्ञ अवस्था मिळविणे सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. ते संतांचे काम असे आपण सर्रास म्हणतो. पण याच संतांनी गृहस्थ राहून देखील मनाची मशागत कशी करावी याचे प्रबोधन केले.

भगवान बुद्धाला सामान्य माणसाच्या दुःखाचा उतारा हवा होता. त्याकरिता घनघोर तप करून विपश्यनेचा मार्ग पुनरुज्जीवित केला ज्याने मानवाच्या विलक्षण सुखाला साद घातली. त्यांनी सांगितलेला मार्ग सामान्य माणसाला साध्य करण्यासारखा आहे. त्यांच्या कोणत्याही शिल्पाकडे बघा तथागत सुखाच्या हिंदोळ्यावर बसलेले दिसतात. शेवटी काय तर वर्तमानात भौतिक सुखांनाच अंतिम सुख मानण्याच्या आमच्या वृत्तीने आम्हाला खऱ्या सुखापासून वंचित केले आहे हेच खरे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com