कोकणात जाण्यासाठी 'गणपती विशेष'ची चाकरमान्यांना प्रतिक्षाच; प्रस्तावाला अद्याप मंजूरी नाही

कोकणात जाण्यासाठी 'गणपती विशेष'ची चाकरमान्यांना प्रतिक्षाच; प्रस्तावाला अद्याप मंजूरी नाही

मुंबई : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी दरवर्षीप्रणाणे यंदाही विशेष रेल्वे चालविण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यामध्ये 11 ऑगस्टपासून नियोजन केले होते, मात्र अद्याप या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाकडून कोणताही निर्णय न झाल्याने कोकणात गौरी गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यां चाकरमान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने चार विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले होते. विशेष रेल्वेच्या सुमारे 208 फेऱ्या करण्यासंदर्भातील मार्ग आणि वेळा सुद्धा रेल्वे मंत्रालयाला प्रस्तावामध्ये पाठविण्यात आला होता. 11 ऑगस्टपासून 3 सप्टेंबरपर्यंतचे हे नियोजन केले होते. मात्र, यावर अद्याप रेल्वे मंत्रालयाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आता एसटी किंवा खासगी वाहतुकीशिवाय अन्य पर्याय नाही आहे.

कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात याव्यात म्हणून रेल्वेच्या प्रवासी संघंटना सुद्धा आग्रही होत्या, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा निवेदन दिले होते. मात्र, रेल्वे मंत्रालयाने अद्याप गणपती उत्सवाच्या निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावरील विशेष रेल्वे सोडण्याला हिरवी झंडी दाखवली नसल्याने आता विशेष रेल्वे धावण्याची शक्यता मावळली असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्यावतीने परिवहन मंत्री अनिल परब यांना फोन करून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

राज्यात कोव्हिड-19 चे राज्य सरकार योग्य नियोजन करत असताना केंद्र सरकार कडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. कोकणातील गणपती उत्सवाला मोठी परंपरा आहे. मात्र, त्यामध्ये केंद्र सरकार राजकारण करून अद्याप कोकण रेल्वेमार्गावरील गणपती उत्सवासाठी विशेष रेल्वेला मान्यता दिली नाही. यामध्ये राज्य सरकारची बदनामीचा डाव केंद्राने आखला आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारच्या राजकारणामुळे कोकणी माणूस सणापासून वंचित राहत आहे.
- शांताराम नाईक, अध्यक्ष, वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना

रेल्वे मंत्रालयाकडून कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवासाठी स्पेशल रेल्वे सोडण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मात्र राज्य शासनाच्या मान्यतेची वाट पाहत आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com