दिलासादायक बातमी! आज दिवसभरात तब्बल 'इतके' रुग्ण झाले कोरोनामुक्त ; आरोग्य मंत्र्यांची माहिती..

rajesh tope
rajesh tope

मुंबई: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढत चालला आहे. राज्यात आज कोरोनाचे तब्बल १२०२ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आलंय अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. 

आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधीक संख्या आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के इतका आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आला आहे.       

 लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोनमध्ये बऱ्यापैकी शिथीलता देण्यात आली आहे. तसंच खासगी डॉक्टर्स आणि शासन यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु करावे: 

पावसाळा तोंडावर आल्यामुळे कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरू करणं  आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात नॉन रेड झोनमध्ये बाजारपेठा, दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करावेत यासाठी शासन आणि त्यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

राज्यात साधनांची कमतरता नाही: 

राज्यात कोरोनाच्या प्रतिकारासाठी साधनांची अजिबात कमतरता नाही. मुंबईत सध्या खाटांची कमतरता जाणवत आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नाही. गेल्या काही दिवसंपासून बीकेसी, वरळी डोम, गोरेगाव इथे कोरोना केअर सेंटर उभारणी केली जात आहे. कोरोना केअर सेंटर या वर्गवारीमध्ये एक लाख खाटा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोना हेल्थ सेंटर वर्गवारीमध्ये अतिरिक्त १५ हजार खाटा तर अतिदक्षता विभागाच्या २ हजार खाटा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसंच खासगी रुग्णालयातल्या ८० टक्के खाटा घेण्यात येणार असून शासन निश्चित दरानं उपचार तिथे केले जाणार आहेत. 

राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्के: 

राज्यात दिवसाला सुमारे १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी ६७ प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. राज्याचा मृत्यूदर हा ३.२ टक्के एवढा असून रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्के आहे.

मालेगावातला मृत्यूदर कमी होतोय:  

मालेगावातला मृत्यूदर कमी होत आहे. तिथे खासगी दवाखाने बंद असल्याच्या काळात मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं. त्यानंतर तिथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांना विश्वासात घेतलं त्यानंतर खासगी दवाखाने सुरू झाले. आता त्याचे परिणाम दसू लागले आहेत. तसंच मृत्यूदरही कमी झाला आहे. राज्यातली सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या मालेगावमध्ये टेली रेडीओलॉजी सुरू केली आहे. भयभीत झालेल्या लोकांना विश्वास मिळाला असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

आरोग्य विभागातली रिक्त पदं भरणार: 

आरोग्य विभागातले डॉक्टर्स, विशेषज्ञ, नर्स, कर्मचारी यांची १७ हजार रिक्त पदं येत्या दोन महिन्याच्या आत भरण्यात येतील. त्यासाठी काल विभागाची सविस्तर बैठक पार पडली. लॉकडाऊनच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक असणाऱ्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. शिवाय राज्यात रुग्ण हा केंद्रबिंदू मानून धोरण तयार केलं जात आहे. रुग्णांची खसगी रुग्णालयांकडून लूट थांबविण्यासाठी दरनियंत्रण कायदा करण्यात आला आहे आणि त्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधिकारीही नेमले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.  

1200 above corona patients discharged from hospital today read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com