मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्यात १ जुन १९४७ रोजी स्थापन झाले. त्याच दिवशी एसटीची पहिली फेरी अहमनगर ते पुणे मार्गावर धावली होती. याला आता ७५ वर्षांचा ज्वलंत इतिहास झाला असून, १ जुन एसटी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा दिवस झाला आहे. त्यामूळे १ जुन रोजी एसटीचा ७५ वर्षांचा अमृत महोत्सव साजरा होणे आवश्यक होता.
मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली नसल्याने ३ जुन रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, मात्र, ओडीसातील रेल्वेच्या दुर्घटनेमूळे एसटीचा अमृत महोत्सव रद्द केला आहे. त्यामूळे राज्यभरातून या महोत्सवासाठी आलेले कर्मचारी आल्या पावली परत जाण्याची वेळ आली असून, सरकारला एसटीच्या अमृत महोत्सवाचे महत्व नसल्याची सर्वत्र टिका केली जात आहे.
दरवर्षी एस टी महामंडळाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला जात होता. मात्र यंदा पहिल्यांदाच वर्धापनदिन १ जून ऐवजी ३ जून रोजी आयोजित करण्यात आला.त्यामूळे एक लाख कामगारांच्या ७५ वर्षांच्या कष्टाच्या इतिहासाच्या आठवणी जागवणारा एस टी महामंडळाचा वर्धापनदिन साजरा होऊ शकला नाही.
ज्यामध्ये या वर्धापनदिनानिमित्त २५ वर्षे विनाअपघात सेवा केलेल्या चालकांचा सत्कार करण्यात येणार होता. शिवाय चांगली कामगिरी केलेल्या ३ विभाग नियंत्रक तसेच ९ आगार व्यवस्थापक यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार होता. परंतु या सर्वांच्या उत्साहावर पाणी पडल्याची टिका कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघंटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवणे यांनी केली आहे.
अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत असताना,एसटीच्या वैभवात ज्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे त्या सेवेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना भेट म्हणून थकीत महागाई भत्ता मिळेल व वेतनवाढ त्रुटी दूर होतील अशी आशा होती पण त्यावर पाणी पडले. सरकारचा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास एवढेच म्हणावे लागेल.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस
१ जुन २०२३ रोजी होणारा एसटीचा अमृत महोत्सव कार्यक्रम शासन/प्रशासनाच्या दिरंगाई मुळेच रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. कर्मचाऱ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून गेल्या ७५ वर्षापासून एसटीची पाळेमुळे रुजवली आहे. या अमृत महोत्सव कार्यक्रम निमित्ताने कर्मचाऱ्यांचा सहपत्निक सत्कार होणार होता तसेच कर्मचाऱ्यांच्या हिताच्या घोषणा होतील या आशेवर बसलेल्या कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
- हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना
सर्वसामान्य गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांची जीवनवाहिनी म्हणून एसटी महामंडळाचा नावलौकिक आहे. एसटीच्या योगदानात कामगारांचा मोठा वाटा आहे त्यामुळे ७५ वा अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त १ जून रोजीच कार्यक्रम घेणे आवश्यक होते. तसेच कामगारांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकी सह ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करणे अपेक्षित होते. परंतु सरकारला कामगारांबद्दल काही कळवळा नसून पुतणा मावशीचे प्रेम दिसून येत आहे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.