छोटू चायवाला मुंबई सोडण्याच्या मार्गावर; 26/11 हल्ल्यातील योद्ध्यावर लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकट

छोटू चायवाला मुंबई सोडण्याच्या मार्गावर; 26/11 हल्ल्यातील योद्ध्यावर लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकट


मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प आहे. त्यामुळे स्थानकालगत छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची आर्थिक घडी पुर्ण विस्कटली आहे.  26/11 मुंबई दहशतवादी हल्यात जखमींची मदत करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या चहाविक्रेता छोटू चहावाला उर्फ तौफीक कुरेशी यांच्यावरही या संकटामुळे मुंबई सोडण्याची वेळ आली आहे. सिएसटीएम स्थानक बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती पुर्ण कोलमडली आहे. त्यामुळे तौफीकने बिहारमधील आपल्या गावी जाऊन नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

1995 मध्ये तौफीक कुरेशी बिहारमधून मुंबईला आले. पोट भरण्यासाठी सिएसटीएम स्थानकावर चहा टपरीवर त्यांनी काम केले. तिथेच त्यांना छोटू चायवाला हे नाव मिळाले. हळूहळू त्यांनी स्वत:चा चहा विकण्याचा व्यवसाय सुरु केला. लॉकडाऊनपुर्वी त्यांनी अधिकृत चहा स्टॉल सुरु केले. मात्र लॉकडाऊननंतर त्यांचा व्यवसायच ठप्प झाला. या दरम्यान त्यांनी दुकानावर काम करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना नियमीत पगार दिला. मात्र, आता डोक्यावर 3 लाखांचे कर्ज, उत्पन्न काहीच नाही. त्यामुळे छोटूने बिहारमधील गावी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

26/11 मुंबई दहशतवादी हल्यादरम्यान दहशतवादी कसाबने सीएसएमटी स्थानकावर अंधाधूंद गोळीबार केला, त्यावेळी तौफीक स्थानकावर होते.  स्टेशन मास्तरच्या कॅबीनमध्ये ते लपले. गोळीबारात स्टेशन मास्तर जखमी झाले. छोटू अगदी थोडक्यात बचावला. मात्र, या परिस्थितीतही  विलक्षण धैर्य दाखवत तौफीक यांनी हातगाडी घेऊन अनेक जखमींना बाजूच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले. जवळपास आठ तास ते जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम करत होते. सकाळ उजाडताच त्यांनी सर्व पोलिसांना चहादेखी दिला. त्यांच्या या कामाची दखल प्रसारमाध्यमांनीही घेतली. जीव वाचलेल्या अनेकांनी याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. काहींनी कपडे, काहींनी पैसै दिले. तब्बल, 22 पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. 
पुरस्कारांमधून 70 हजाराची रक्कम मिळाली. सोबतच रेल्वे अधिकाऱ्यांकडून काही पैसै उसने घेत तौफीक यांनी 2009मध्ये स्वत:चा एक स्टॉल सुरु केला. एक महिन्यापुर्वी त्यांनी परवाना प्राप्त दुसरा अधिकृत टी स्टॉल सुरु केला. त्यामध्ये लाखभर रुपयाचे सामानही भरले. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले.

लॉकडाऊननंतर दुकान सुरु झाले. मात्र धंदा बसला आहे.  लॉकडाऊनपुर्वी 60 लिटर दूध लागायचे, 100 कप चहा विकायचो. आता केवळ 10 लिटर दूध लागते. थर्मासमध्ये चहा विकावा लागतो.  त्यामुळे आर्थिक बाजूने खचलो आहे. हे सर्व विकून मला घरी जावे  लागणार आहे.

परतेल की नाही, माहित नाही!
तौफिक यांना पाच मुली आहेत. मात्र, लाॅकडाऊनमुळे काहीच उत्पन्न नसल्यामुळे पत्नी बोरीवलीला माहेरी गेली आहे. मुली हॉस्टेलमध्ये आहेत. त्यामुळे कुटुबांचे आर्थिक गणित विस्कटून गेले आहे. 1995 मध्य मुंबईला मी आलो. मुंबईने मला खूप काही दिले. मात्र, आता नव्याने सुरुवात करण्यासाठी मला गावाला जाण्याशिवाय काही पर्याय नाही.  मी मुंबईत परत येईल की नाही, मला माहिती नाही, असे तौफिक सांगतात.

मदतीसाठी हात सरसावले
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे तौफीकची आज दुपारी 3.40 वाजता भेट घेतली. यावेळी त्यांनी तौफिकला मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबई उपाध्यक्ष सलीम खान यांनी स्वतःतर्फे व पक्षातर्फे छोटू यांना आर्थिक मदत करू, असे सांगितले आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com