शिवसेनेच्या अरेरावीने काँग्रेस त्रस्त; सांगलीबरोबर आता मुंबईही जाण्याची शक्यता?
Loksabha Election 2024: शिवसेनेने (उद्धव ठाकरे) बुधवारी आपल्या १७ जागांची घोषणा केल्यानंतर काँग्रेसकडून व्यक्त होणाऱ्या नाराजीमागे सांगलीबरोबरच मुंबई हेही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येते.
२०१४ पर्यंत मुंबईत पाच खासदार असलेल्या काँग्रेसला यावेळी एकही जागा अद्याप मिळालेली नाही. देशाच्या आर्थिक राजधानीतून काँग्रेसची निशाणीच गायब होण्याच्या शक्यतेने काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
बहुभाषिक, बहुसांस्कृतिक मुंबई केवळ देशाची आर्थिक राजधानीच नव्हे, तर भारताची प्रतिकृती मानली जाते. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत या शहरात प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला जागा न मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
उत्तर पश्चिममधून माजी खासदार संजय निरुपम आणि दक्षिण मध्य मधून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.
मात्र या जागांवर शिवसेनेने नावांची घोषणा केल्यामुळे काँग्रेसची गोची झाली आहे. निरुपम यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या असून बाळासाहेब थोरात, नाना पाटोले यांनीही शिवसेनेच्या अरेरावीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
२०१९ ला मुंबई उत्तर मध्य मधून पूनम महाजन, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक आणि मुंबई उत्तरमधून गोपाल शेट्टी असे भाजपचे तीन उमेदवार निवडून आले होते.
उत्तर पश्चिम ( गजानन कीर्तिकर), दक्षिण मध्य (राहुल शेवाळे) आणि दक्षिण (अरविंद सावंत) असे तीन उमेदवार शिवसेनेचे निवडून आले होते. २०१४ मध्ये ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या निवडून आले होते, उमेदवारातील हा बदल वगळता २०१९ ला निकालात कोणताच बदल झाला नव्हता.
त्याआधी २००९ च्या निवडणुकीत ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील आणि इतर पाचही मतदार संघांतून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. २०१४ पर्यंत सहापैकी पाच खासदार काँग्रेसचे आणि एक राष्ट्रवादीचा होता.
आता मुंबईत काँग्रेसला २०२४ च्या निवडणुकीत एका जागेसाठी याचकाच्या भूमिकेत जाणे नामुष्कीजनक मानले जाते. उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई अशा दोन जागांवर काँग्रेसच्या आशा टिकून आहेत.
परंतु उत्तर मुंबईतील उमेदवाराचे नाव निश्चित झाले असून दोन दिवसात ते जाहीर केले जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितल्यामुळे मुंबई उत्तरची जागा काँग्रेसला मिळण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. याठिकाणी काँग्रेसकडून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे नाव चर्चेत होते.
‘वंचित’च्या जागा ढापल्याः कॉँग्रेसची तक्रार
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आपल्या कोट्यातील काही जागा वंचित बहुजन आघाडीला देणार होती, त्यासाठी ४८ पैकी सर्वाधिक २२ जागा शिवसेनेला द्यायचे महाविकास आघाडीच्या प्रारंभीच्या बैठकीत ठरले होते. परंतु ‘वंचित’सोबतची आघाडी फिसकटल्यानंतर शिवसेना या जागा परस्पर ढापत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.