फुलांचे झाले अश्रू... बहरलेले पीक सुकल्याने शेतकरी हवालदिल

झाडावरच सुकलेली फुले
झाडावरच सुकलेली फुले

अंबरनाथ : `अश्रूंची झाली फुले` नाटक आपणा सर्वांच्या परिचयाचे आहे. मात्र, अंबरनाथ तालुक्यातील फुलांची शेती करणाऱ्यांवर सध्याच्या संचारबंदीमुळे `फुलांचे झाले अश्रू` असे म्हणण्याची वेळ आली आहे. एेन मोसमात कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या फुलांच्या व्यवसायावर यंदा कोरोनाच्या संचारबंदीने पाणी फेरले आहे. संपूर्ण शेत फुलांनी भरलेले बघायची सवय असलेल्या शेतकऱ्यांना आता त्याच जागी निर्माल्य पाहावे लागत आहे. फुले हातात तर आली नाहीच, मात्र मजुरी अंगावर येऊन कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याने ते डोक्याला हात लावून बसले आहेत.

हेही वाचा : चिमुकलीने असं काही केलं की सगळे पाहतच राहिले 

जीवनावश्यक धान्य, भाजीपाला आणि फळांची विक्री होत असताना त्याच शेतमालाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या फुल उत्पादकांच्या नशिबी मात्र जीवापाड मेहनत घेऊनही हारच आली आहे. काही दिवसांपूर्वी बहरलेल्या फुलांच्या जागी आता निर्माल्य झाले आहे. होळीनंतर लगेच कोरोना संकटामुळे संचारबंदीचे सावट घोंघावू लागले. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली. सर्वच प्रार्थनास्थळे बंद झाली. बारशापासून बाराव्यापर्यंत सर्व कौटुंबिक, राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक समारंभ रद्द झाल्याने अशा सोहळ्यांचा अपरिहार्य भाग असलेल्या फुलांचा बाजारच उठला.

वाढदिवस, लग्न समारंभ, तारांकित हॉटेलातील मेजवान्या आणि पार्ट्यांची शोभा वाढविण्याचे काम निरनिराळी फुले करीत असतात. वाढदिवसाला इतर भेटवस्तूंसोबत पुष्पगुच्छ दिले जातात. काही तास ते एक-दोन दिवसांचे आयुष्य असणाऱ्या रंगीबेरंगी फुलांच्या व्यवहारातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र सध्या सर्वच व्यवस्था ठप्प झाल्याने फूल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

धक्कादायक : पालघरनंतर आता वसईत जमावाचा हल्ला

परंपरागत शेती व्यवसायातून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळताना अंबरनाथ तालुक्यातील अनेक कृतिशील शेतकऱ्यांनी कडधान्य लागवड आणि फळ बागांबरोबरच फुलशेती करायलाही सुरुवात केली. दहा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजनमधून नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणून फुलशेतीसाठी प्रोत्साहनपर अनुदानही दिले. त्यातून काही शेतकऱ्यांनी काकडा, मोगरा, सोनचाफा, मोगरा, मदनबाण, गुलाब, चमेली, जाई, जुई आदी फुलांची शेती केली. मोगरा, सोनचाफा, चमेली, डस्टर, जाई, जुई आदी फुले मोठ्या प्रमाणात विकली जातात.

मुंबईत दादर आणि कल्याणला फुलांचे घाऊक बाजार भरतात. तिथून उपनगरांमध्ये फुले वितरित होतात. जलबेराचा अपवाद वगळता इतर सर्व फुलांचे आयुष्य जेमतेम काही तासांचे असते. त्यामुळे ती साठवून ठेवता येत नाहीत. त्यामुळे बाजारातही ग्राहकांची फारशी वर्दळ नसेल तर मिळेल त्या किमतीला फुले विकावी लागतात. लॉकडाऊनच्या सावटाने अतिशय नाजूक अशा फुलांचा व्यवसाय देशोधडीला लागला आहे.

महत्त्वाचं : कोरोना संकटात दुकानदारांनी अशी सुरू केली लूट

उत्पादन नाही... खर्च वाढला

भाजीपाला, फळे आणि धान्याचा शेतमाल संचारबंदीतही विकला जातोय. फुलांच्या व्यवसायावर मात्र संक्रांत आली आहे. त्याचे उत्पन्न शून्यावर आले आहे. त्यात घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत. आमची सुमारे पाच एकर फुलशेती आहे. मजूर सोडून जाऊ नयेत म्हणून त्यांना मासिक वेतन द्यावे लागत आहे. बागेच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च करावा लागत आहे. आमच्या शेतात बहुतांशी काकडाची शेती आहे. ती फुले काढून उपयोग नसल्याने त्याची पूर्ण शेती जागीच करपून गेली आहे. उत्पादन काहीही नाही आणि खर्च वाढला आहे, असे वांगणीजवळील काराव गावातील शेतकरी अशोक बनोटे यांनी सांगितले.  

नुकसानभरपाई तरी मिळावी
आम्ही गुलाब, चमेली, मदन बाण, मोगरा, फणस, चिकू आदींची लागवड केली आहे. यंदा आंबा अजिबात आला नाही. चिकूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आल्याने तो जागीच सडण्याची वेळ आली. तो बाजारात विकता आला नाही. तीच अवस्था फुलांची झाली आहे. एकही फुल विकता आले नाही. त्यामुळे यंदा पीक येऊनही आर्थिक फायदा झाला नाही. शेतीचा विमाही नाही. त्यामुळे सरकारने अन्य पिकांप्रमाणे नुकसानभरपाई दिली तर थोडाफार हातभार लागेल, अशी मागणी अंबरनाथ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी रमेश देशमुख यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com