मायदेशी परतणाऱ्या प्रवाशांची मुंबई विमानतळावर लूट; खासगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडेवसूली...

मायदेशी परतणाऱ्या प्रवाशांची मुंबई विमानतळावर लूट; खासगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडेवसूली...
Updated on

मुंबई : विविध देशांत शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेले अनेकजण लॉकडाऊनमुळे भारतात परत येत आहे. अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्याने ते मायदेशी परत येत आहे. अशाचप्रकारे ओमानच्या मस्कत येथे नोकरीसाठी वास्तव्यास असलेले किरण महाडिक नोकरी गेल्याने बुधवारी (ता. 29) भारतात परतले. मुंबई विमानतळावर आल्यावर सातारा जाण्यासाठी त्यांनी विमानतळावर चौकशी केली. विमानतळावर जीव्हीके व्यवस्थापनाने नेमलेल्या खासगी वाहतूकदार प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याने महाडिक यांच्यासह अनेक प्रवाशांना  त्रास सहन करावा लागत आहे. 

'वंदे भारत' अभियानांतर्गत मायदेशात परतणाऱ्या नागरिकांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जीव्हीके कंपनीने नेमलेल्या खासगी वाहतूकदारांकडून लुट सुरू आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठी जीव्हीके कंपनीने अकबर ट्रॅव्हल्स आणि साई ट्रॅव्हल्सची प्रवासी वाहतूकीसाठी नेमणूक केली आहे. विमानतळावर पोहचल्यानंतर वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारल्या जात असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्तीच विमानतळावर केली असल्याचे दिसून येत आहे.

परदेशात प्लंबर, कारपेंटर, गवंडी, घरकाम, हॉटेल, व्यवसाय तसेच मजुरी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे कोरोनामुळे काम बंद पडल्याने ते  मायदेशी परतत आहे. विमानतळावर उतरल्यानंतर कोरोना तपासणी करून मुंबईतील प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. तर परजिल्ह्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सची विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीके कंपनीने नियुक्ती केली आहे. त्यासाठी प्रतिकिलोमीटर प्रत्येक वाहनांचा वेगवेगळा दर निश्चित करून देण्यात आला आहे. तरीसुद्धा या खासगी वाहतूकदारांकडून अतिरिक्त भाडेवसूली केली जात आहे. यामध्ये दोन्ही मार्गांवरील भाडे वसूलीसह टोल टॅक्स, चालक शुल्काच्या नावावर अतिरिक्त 1500 रूपयांची वसूली केली जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. 


सध्या परदेशातून परतणारे नागरिक अडचणीत आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, मुंबई विमानतळावर नेमलेल्या खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. सातारा जाण्यासाठी सुरुवातीला 7 हजार 800 रूपये सांगितले. मात्र, एका अधिकाऱ्यांच्या ओळखीने अखेर सात तासांच्या प्रयत्नानंतर दुसऱ्या वाहनाने 6 हजार रूपयांत सातारा जाण्यास मान्य केले.
- किरण महाडीक, सातारा

मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या खासगी वाहतुकदारांकडून प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यांनीच भाड्यांचे दर सुद्धा निश्चित करून दिले आहे. त्याप्रमाणेच प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्यात सोडले जात असून कोणत्याही प्रकारची जादा भाडे वसूली केली जात नाही.  
- विनी पिल्लई, मुख्य जनसंपर्क अधिकारी, एमआयएएल

----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com