पाणावलेल्या डोळ्यांनी थोडं वास्तवाकडे पहा...

पाणी टंचाईमुळे निष्पाप जीव गेले, यावरून मनसे आमदार पाटलांचे पालकमंत्री शिंदे यांना भावुक पत्र
Five died due to water scarcity letter from MNS MLA Raju Patil  to Eknath Shinde dombivali
Five died due to water scarcity letter from MNS MLA Raju Patil to Eknath Shinde dombivalisakal

डोंबिवली - देसलेपाडा येथील पाणी टंचाईमुळे 5 जणांचा जीव गेला आहे. एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती गेल्याने त्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावरून आता कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भावुक पत्र पाठविले आहे.आपण चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त असाल, तुम्हाला ही घटना माहीत नसावी म्हणून हा पत्रप्रपंच असे ट्विट करीत त्यांनी हे पत्र ट्विट केले आहे. पाण्यापायी जीव गेला हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील, आता त्याच डोळ्यांतून थोडं वास्तवाकडे पहा असा टोला त्यांनी पालकमंत्री शिंदे यांना लगावला आहे.

कल्याण ग्रामीण चे आमदार राजू पाटील हे ग्रामीण भागातील पाणी प्रश्नावर सातत्याने आवाज उठवित आले आहेत. परंतु अद्याप या भागातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. यावरून आता आमदार पाटील यांनी थेट पालकमंत्र्यांना पत्र व्यवहार केला आहे. एक पत्र त्यांनी ट्विट केले असून यामध्ये त्यांनी विशेष विनंती करत "तुम्ही सध्या वाहिन्यांवर दिसता पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने. तुम्हाला कदाचित ही दुर्दैवी घटना माहीत नसेल म्हणून हा पत्रप्रपंच. पाण्यासाठी वणवण, तहानेने कासावीस होणे, हे सगळं एव्हाना सवयीचे होऊन गेलंय. पण आता पुढची पायरी गाठली गेली हो. पाण्यामुळे मृत्यू झालाय, एक दोघांचा नाही तर 5 निष्पाप जीवांचा.

तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, 'पाण्यापायी जीव गेला' हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. आता त्याच डोळ्यातून थोडं वास्तवाकडे" पहा असा टोला देखील त्यांनी पत्रातून लगावला आहे. पत्रातून त्यांनी आयुक्तांविषयी देखील झोड घेतली या सगळ्याला जबाबदार कोण ? पाणी द्या, पाणी द्या सांगून 27 गावं गेली अनेक वर्ष उर बडवतायत. पण तुम्ही ज्यांना आयुक्त म्हणून नेमलेय त्यांच्या कानाशी तो आवाज पोहोचतच नाहीय. आमच्या नागरीकांच्या डोळ्यात पाणी आणायचं आणि तेच पाणी पिऊन जगा असं सांगायचं. तहान भागवण्यासाठी आयुक्तांनी केलेली योजना तर नाही ना ही ? आता तर रडून भेकून डोळेही कोरडे पडले. आता काय ? अजून काही मृत्यू व्हायची वाट पाहायची का ? म्हणजे आणखी डोळ्यातून पाणी येईल हो,पण नळाला येणार नाही. आमच्या जीवावर उठलेला असा आयुक्त आम्हाला नको शिंदे साहेब…असे त्यांनी म्हटले आहे.

कल्याण ग्रामीण मतदार संघातील रस्ते,पाणी,वाहतूककोंडी,कचरा व इतर समस्या आपल्याकडे मांडण्यासाठी मी अनेकवेळा आपल्यासोबत संबंधीत अधिकाऱ्यांना घेऊन बैठक लावावी यासाठी विनंती केली आहे परंतु यात कोणते राजकारण आडवे येते हे मला समजत नाही आणि जर तसे काही असेल तर राजकारण बाजूला ठेवूया आणि 'मृत्यूकारण' तपासून पाहूया. आणि म्हणूनच मी आमदार असलो तरी हे पत्र मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला पाठवतो आहे. बघू-पाहू-करू हे न करता ताबडतोब कृतीची अपेक्षा आहे. ताबडतोब बैठक घ्या, ताबडतोब निर्णय घ्या, आणि ताबडतोब न्याय द्या. लाथ माराल तिथे पाणी काढणारे तुम्ही. कुठे आणि कशी लाथ मारायची ते तुम्हाला नक्कीच माहिती असणार असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com