धक्कादायक! मुंबईतील 'या' ठिकाणी बोगस मतदारांचा सुळसुळाट

धक्कादायक! मुंबईतील 'या' ठिकाणी बोगस मतदारांचा सुळसुळाट
धक्कादायक! मुंबईतील 'या' ठिकाणी बोगस मतदारांचा सुळसुळाट

नवी मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणुकांसाठी तयार होत असलेल्या मतदार याद्यांमध्ये बोगस नावे घुसवण्यासाठी एका अधिकाऱ्याने सर"सकट' पैसे वसुली सुरू केली. अधिकारीच पैसे घेऊन बोगस नावे घुसवत असल्याने नवी मुंबईतील सर्वच प्रस्थापित नगरसेवकांमध्ये बोगस नावे घुसवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. प्रभागातील मतदार याद्यांमध्ये एक हजार ते दीड हजार नावे घुसवून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून 50 हजार ते एक लाखापर्यंतच्या रकमा स्वीकारल्या जात असल्याची चर्चा आहे.

मार्च 2020 मध्ये होऊ घातलेल्या नवी मुंबईच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सध्या निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या दुरुस्त करणे, नाव नोंदणी करणे, पत्ता व नावात दुरुस्ती करणे अशा स्वरूपाची कामे केली जात आहेत. मतदार याद्या दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेचा गैरफायदा निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतला जात असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. पॅनेल पद्धतीने होणाऱ्या निवडणुका रद्द झाल्यामुळे आता एक सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार हे निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे पुन्हा आपणच निवडून येण्यासाठी प्रस्थापितांसहीत नवखे इच्छुकही गुडघ्याला बाशिंग बांधून रिंगणात उतरले आहेत. परंतु विजयासाठी हवा असलेला जनाधार कमी असल्यामुळे गेल्या निवडणुकीत पराभव झालेल्या आणि काठावर पास झालेल्या काही नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस नावे मतदार यादीत घुसवण्याचे काम जोरात सुरू आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ अशा भागातील रहिवाशांच्या नावांचा गैरवापर करून, ही नावे चढवली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेतर्फे उपनेते विजय नाहटा आणि भाजपतर्फे आमदार मंदा म्हात्रे यांनी बोगस नावांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयोगाने तब्बल दहा हजार बोगस नावे वगळली होती. मात्र, आता पुन्हा महापालिका निवडणुकीत बोगस मतदारांचे वारे वाहू लागल्यामुळे प्रमाणिक लोकप्रतिनिधींवर अन्याय होण्याची शक्‍यता आहे. 

कशी होते बोगस नावाची नोंदणी? 
मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी रहिवासी दाखला म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज देयके हे अनिवार्य आहेत. तर ओळख पत्र म्हणून पॅन कार्ड, वाहन परवाना आदी बाबी चालतात. एखाद्या खऱ्या व्यक्तीचे हे पुरावे घेऊन ते संगणकात स्कॅन करून नंतर विविध सॉफ्टवेअरमध्ये त्यावर काम करून व्यक्तींची नावे, छायाचित्र व पत्ते बदलून नाव नोंदणीसाठी आवश्‍यक कागदपत्रे तयार केली जातात. नंतर ही कागदपत्रे संगनमत असलेल्या अधिकाऱ्याकडे सोपवून नावे नोंदवली जात आहेत. 

नियम काय म्हणतो! 
निवडणूक आयोगाने नेमलेल्या केंद्र पातळीवरील अधिकाऱ्यांमार्फत अर्जदारांच्या घरी जाऊन, त्यांचा पत्ता खराखुरा असल्याचे तपासून तो जिवंत अथवा मृत असल्याची खात्री करून नंतर मतदार यादीत नाव नोंदवले जाते. मात्र, ही प्रक्रिया करणाऱ्या बीएलओवरील अधिकाऱ्यांनीच संगनमत केले असल्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. 

निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल 
बेलापूर विधानसभा आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील महापालिका प्रभागांच्या मतदार यादीत बोगस नावे नोंदवण्याबाबत कॉंग्रेसचे नेरूळ अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि राज्यमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे. कोणत्या विभागात बोगस नावांची नोंदणी होत आहे, याची देखील सावंत यांनी माहिती आयोगाकडे सादर केली. त्यामुळे बोगस नावे नोंदवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com