मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी (ता. 5) सकाळपर्यंत तलावांमध्ये 98 टक्के पाणीसाठा जमा होता. आता वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी अवघा सात दिवसांचा पाणीसाठा कमी आहे; तर भातसा धरणही 98 टक्के भरले आहे.
मुंबईतील पाणीपुरवठ्याचे नियोजन 1 ऑक्टोबर ते 31 जुलैपर्यंत करण्यात येते. त्यासाठी तलावांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होणे आवश्यक असते. आज 14 लाख 19 हजार 32 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. तीन वर्षांतील हा सर्वाधिक साठा आहे. 2018 मध्ये 13 लाख 95 हजार 306 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता, तर 2019 मध्ये 14 लाख 16 हजार 217 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. यंदा जुलै महिन्यापर्यंत चांगला पाऊस झाला नव्हता. त्यामुळे 5 ऑगस्टपासून पाणीकपात करण्यात आली.
त्यातच लॉकडाऊनमुळे उद्योग आणि व्यवसाय अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने पाण्याची बचत झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने मुंबईबाहेरील तलावांच्या क्षेत्रात सरासरी 1 हजार मिमीपेक्षा कमी पाऊस होऊनही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत; तर अप्पर वैतरणात 96.81 टक्के आणि भातसा तलावात 97.97 टक्के पाणीसाठा जमा आहे. मुंबईला रोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यातील 1800 ते 2000 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा हा एकट्या भातसा तलावातून होतो. मध्य वैतरणा धरणही 96.95 टक्के भरले आहे.
तलावांमधील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
तलाव | पाणीसाठा | उपयुक्त पाणीसाठा (टक्के) |
|
अप्पर वैतरणा | 219815 | 96.81 | |
मोडकसागर | 128925 | 100 | |
तानसा | 144475 | 99.58 | |
मध्य वैतरणा | 189633 | 96.95 | |
भातसा | 702496 | 97.97 | |
विहार | 27697 | 100 | |
तुलशी | 7990 | 99.30 |
-----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.