धारावीला उभारी मिळणार कशी? अनेक स्थलांतरित निघाले गावाला...

dharavi
dharavi

मुंबई : कोव्हिड-19 महामारीमुळे दीड महिन्यापासून धारावीतील पाच हजारांहून अधिक उधोगधंदे ठप्प असून, कामगारांची उपासमार होत आहे. कोरोना  आणि उपासमारीने मरण्यापेक्षा मूळ गावी जाण्याचा निर्णय परप्रांतीय मजुरांनी घेतला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मजुरांच्या स्थलांतरामुळे येथील उद्योगांना उभारी मिळणार कशी, असा पेच निर्माण झाला आहे. 

अत्यंत दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीत दहा बाय बारा फुटांच्या घरात आठ ते दहा जण राहतात. दुमजली-तीन मजली झालेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहेत. आता धारावी कोरोनाचा रेड झोन झाला आहे. रहिवासी धास्तावले आहेत. मजुरांच्या स्थलांतरामुळे उद्योग पुन्हा सुरू होतील की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. लॉकडाऊनची पहिली घोषणा झाली, तेव्हा मजुरांनी वाट पाहणे पसंत केले. लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढल्यानंतर मजुरांच्या पायाखालची वाळू सरकली. काही कामगारांनी कोणत्याही यंत्रणेला न कळवता थेट गावाचा रस्ता धरला. त्यांची प्रशासनाकडे नोंद नाही. आतापर्यंत सुमारे 2 लाख मजुरांनी स्थलांतर केल्याचे समजते. सध्या धारावीतील एक लाख 30 हजार मजुरांनी गावी जाण्यासाठी पोलिस ठाण्यात फॉर्म भरले आहेत. 

मोठी बातमी ः '18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...​

उद्योजकांची खंत
लॉकडाऊनचा मोठा फटका धारावीतील सुमारे साडेपाच हजार लहान-मोठ्या उद्योगांना बसला आहे. घराघरातील लघुउद्योगांमध्ये हजारो मजूर काम करतात. धारावीत दररोज 200 ते 250 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. उद्योग बंद असल्याने ही उलाढाल ठप्प झाली आहे. धारावीला आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जात नाही, अशी खंत येथील उद्योजक व्यक्त करता. धारावीतील 12 लाख लोकसंख्येपैकी 99 टक्के नागरिक लघुउद्योगांशी जोडले गेले आहेत. आता कोरोनाने त्यांच्या जगण्याचे हाल केले आहेत. तेथील 1028 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून, आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. 

मिनी भारत
ढोर, चर्मकार, हराळे, ककय्या, कैकट्या अशा जाती-पोटजातींमधील नागरिक महाराष्ट्रासह तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमधून धारावीत आले आणि स्थिरावले. आंध्र प्रदेशातून मडिगा समाजातील अनेक जण आले. चामड्याच्या बॅग, पर्स, जाकीट तयार करणारे कारखाने येथे आहेत. येथील उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पॉलिस्टर, रेक्झिन आणि नायलॉन बॅगांचा मोठा उद्योग आहे. सौराष्ट्रातील कुंभार समाज स्वातंत्र्यपूर्वी मोठ्या प्रमाणावर धारावीत आला. जरीकामात बिहारी आणि बंगाली मुस्लिम कारागिरांचे मोठे प्रमाण आहे. भंगार व टाकाऊ प्लास्टिकचा मोठा व्यवसाय आहे. इडली-चटणी, बेकरी उत्पादने, मिठाई, चॉकलेट, लाडू, चिवडा, फरसाण, बिस्किटे, चिक्की बनवण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनामुळे ठप्प झालेल्या या उद्योगांना उभारी कशी मिळणार, हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 
 
दृष्टिक्षेपात

  • लोकसंख्या : 12 लाख
  • उद्योग : 5000
  • दैनंदिन उलाढाल : 200 कोटी
  • स्थलांतर केलेले मजूर : 2 लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com