कर्जत : कर्जत- मुरबाड- शहापूर राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम कंत्राटदार कंपनीकडून वेगात सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर पाण्याचा शिडकावा करण्यासाठी वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग येथील धार नदीच्या पाण्याचा बेकायदा उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे नदी परिसरातील कुरुंग, जांभूळवाडी, नवसूची वाडी, हऱ्याची वाडी येथे पाणीटंचाई निर्माण हाेण्याची शक्यता आहे. या पाणीउपशाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन ग्रामपंचायतीकडून अखेर कंत्राटदार कंपनीस नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा... जाळ्यात मासोली गावतचं नाय...
वारे ग्रामपंचायत हद्दीतील वारे-कुरुंग मार्गावर असलेल्या धार नदीच्या पात्रातून काही दिवसांपासून महामार्ग कंत्राटदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. नदी परिसरातील कुरुंग, जांभूळवाडी, नवसूची वाडी, हऱ्याची वाडी येथील आदिवासी या पाण्यावर अवलंबून असतात. येथे भाजीपाला लागवड करून ते उपजीविका करतात. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी धार नदीतून पाणीउपसा सुरू राहिल्यास येथे पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाचे... आरोग्य केंद्राचेच आरोग्य बिघडते, तेव्हा...
भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून रस्त्याच्या कामासाठी पाणीउपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कंत्राटदार कंपनीस नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती वारे ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश राणे यांनी दिली. तसेच पाणी उपसा थांबवण्यास सांगण्यात आले आहे. पावसाच्या वाहून येणाऱ्या नैसर्गिक स्रोतावर हा पाण्याचा साठा अवलंबून आहे. पाऊस थांबल्याने आता पाणीही कमी झाले आहे. बेकायदा पाणीउपशामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू शकते, अशी शक्यता वारे येथील ग्रामस्थ दीपक बोराडे यांनी व्यक्त केली.
कर्जत- रस्त्याच्या कामासाठी कुरुंग येथील धार नदीतील पाण्याचा बेकायदा उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात येथे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याकरिता ग्रामस्थांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून देवयश ब्रिज गोपाळ या कंत्राटदार कंपनीस नोटीस बजावून पाणीउपसा थांबवण्यास कळवले आहे.
- सुरेखा भांबळे, ग्रामविकास अधिकारी, वारे ग्रामपंचायत
धार नदीतील पाण्यावर आजूबाजूची अनेक गावे अवलंबून आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाण्याचा फवारा करण्यासाठी नदीतून पाणी उपसा करणे चुकीचे आहे.
- शरद म्हसे, वारे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.