मुंबई : रोज केंद्रावर किंवा जनतेवर आरोप करण्यापेक्षा राज्य सरकारचे (Maharashtra government) मंत्री काहीच करीत नाहीत. पण रोज सकाळी मीडियाचा अजेंडा (media Agenda) ठरवून सरकार चालत नाही, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक (Nawab Malik) यांना लगावला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्यांसोबत बैठकी झाल्या. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र हे म्हणजे ‘आधी चोर्या-आता बहाणे’ असा प्रकार आहे, अशा शब्दांत दरेकर यांनी मलिक यांना उत्तर दिले आहे.
स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, हाच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा कार्यक्रम आहे. त्याशिवाय ते काहीच करीत नाहीत, पण रोज सकाळी मिडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
आधी आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, अशी बेफाट विधाने करायची. आणि नोटीस आली की लपून बसायचे, हेच या सरकारमधील माजी मंत्र्यांना येते. तुम्ही जर काही केलेच नसेल तर चौकशीला का घाबरता ? तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार का आहेत ? अशा प्रश्नांच्या फैरी दरेकर यांनी झाडल्या.
असेच प्रकार बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर काही नेते करीत आहेत. मराठी माणसाचा पराभव भाजपने केला वगैरे मोठमोठी वाक्ये ते फेकतील. पण भाजपाच्या 36 विजयी नगरसेवकांपैकी 23 मराठी आहेत, हे कधीही सांगणार नाहीत. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा, असेही दरेकर यांनी सुनावले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.