मुंबई : पावसाळा तोंडावर आल्याने लेप्टोच्या फैलाव होण्याचा धोका आहे. लेप्टोला रोखण्यासाठी पालिकेने तब्बल एक लाख ८५ हजार २७० उंदीर पालिकेने चार महिन्यात मारले आहेत. एक उंदर मारण्यासाठी पालिका 22 रुपये मोजते, अशी माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली.
पावसाळ्यात साथीचे आजार डोकेवर काढतात. लेप्टो, मलेरिया, एच-वन एन-वन, गॅस्ट्रो, हेपेटायसिस आणि डेंग्यू या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा कीटकनाशक विभाग सज्ज झाला आहे. साचलेल्या पाण्यात उंदीर, गायी, म्हशी, घोडे, कुत्रे आणि मांजर यांचे मलमूत्र असल्यास आणि त्याचा संपर्क जखम असलेल्या व्यक्तीबरोबर आल्यास अशा व्यक्तीला लेप्टोचा संसर्ग होतो.
लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी किटक नाशक विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येते. पालिकेने जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत राबवलेल्या मोहिमेत सर्व २४ वॉर्डात १ लाख ८५ हजार २७० उंदरांना मारण्यात आले. उंदरांना हाताने मारण्याबरोबरच अॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते.
पावसाळ्याआधी प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते. मात्र पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. मात्र, ज्यावेळी दोन ते चार दिवस पाऊस पडत नाही, त्यावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते, अशी माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागातील अधिका-याने दिली.
भंगार अडगळीच्या वस्तू नष्ट करा
भंगार व अडगळीच्या वस्तू घरात ठेवू नका. इमारतीचा परिसर, आवार स्वच्छ ठेवा. डेब्रिज व इतर सामान आवारात ठेवू नये, जेणे करून उंदरांना आसरा मिळणार नाही. अन्नपदार्थ उघड्यावर टाकू नये. उंदरांना खायला मिळाले की तिथेच ते बिळे करून राहतात. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते, त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.