Shaktikant Das : बँकांच्या प्रशासन पद्धतीत त्रुटी; दास यांनी व्यक्त केली चिंता

वारंवार सूचना देऊनही बँकांच्या प्रशासन पद्धतीत त्रुटी आढळत असल्याबाबत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Shaktikant-Das
Shaktikant-Dassakal

मुंबई - वारंवार सूचना देऊनही बँकांच्या प्रशासन पद्धतीत त्रुटी आढळत असल्याबाबत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या भारतीय बँकिंग क्षेत्र सुस्थितीत असले तरी अशाचवेळी असे धोके किंवा त्रुटी दुर्लक्षिल्या जातात, असा इशाराही त्यांनी अमेरिकी बँकिंग व्यवस्थेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर दिला.

या त्रुटी दूर झाल्या असल्या तरी त्यामुळे काही उलथापालथी नक्कीच झाल्या असत्या, असाही इशारा त्यांनी दिला. बँकांच्या ताळेबंदावर येणारा ताण आणि आर्थिक कामगिरीतील उणीवा झाकून टाकण्यासाठी तसेच कामगिरी फुगवण्यासाठी स्मार्ट अकाउंटिंग पद्धती वापरण्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. यापूर्वी अनेकदा रिझर्व बँकेने हे मुद्दे त्या त्या बँकांच्या निदर्शनास आणून दिले आहेत असेही ते म्हणाले.

बँकांची प्रशासन पद्धती नियमानुसार व्यवस्थित असेल हे पाहण्याची जबाबदारी बँकांचे अध्यक्ष तसेच संचालक या सर्वांची आहे असेही ते म्हणाले. अनेकदा बँकांच्या निर्णय प्रक्रियेत आणि संचालक मंडळाच्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा वरचष्मा राहतो. असे होणे योग्य नाही, अर्थात सीईओनी त्याचे काम व्यवस्थितपणे पार पाडले पाहिजे, असेही दास म्हणाले.

Shaktikant-Das
Best Bus : बेस्टवर सहा हजार कोटींचे कर्ज; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ७०० कोटींची आहेत देणी

व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रित करतानाही बँकांनी सावध राहिले पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला. अति आक्रमकपणे केलेला विस्तार-वाढ तसेच कर्जे किंवा ठेवी यात कमी किंवा जास्त व्याजदर लावणे तसेच वेगळ्या वाटा न स्वीकारणे यामुळे बँकांसमोर जास्त धोके उत्पन्न होऊ शकतात असा इशाराही त्यांनी दिला. अनेकदा आक्रमकपणे कार्यपद्धती वापरताना बँका आपल्यासमोरील धोके वाढवत असतात, त्यावेळीही रिझर्व बँकेने वेळोवेळी सावधगिरीचा इशारा दिला आहे असेही त्यांनी दाखवून दिले. धोके आणि दीर्घकालीन परिणामांचे विचार न करता अल्पकालीन नफा वाढवला तर तेही योग्य नाही, असेही दास म्हणाले.

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात नुकत्याच झालेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर दास यांचा हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. किंबहुना अशीच आक्रमकपणे राबवलेली वाढीसाठीची धोरणेही नंतर बँकांसमोर अडचणी निर्माण करू शकतात, असेही दास यांनी सांगितले. अर्थात सध्या भारतीय बँकिंग क्षेत्र अत्यंत मजबूत आणि सुरक्षित स्थिर असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मात्र सर्व काही सुरळीत असतानाच असे धोके दुर्लक्षित केले जातात किंवा विसरले जातात. त्यामुळे अशा धोक्यांकडे बँकांच्या संचालक मंडळांनी लक्ष ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com