मुंबई - बेस्ट कंत्राटी कामगार समन्वय समितीने संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी 100 टक्के गाड्या प्रवर्तीत केल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. मात्र कामगार अजूनही संभ्रमात आहेत. काही आगारातून बस बाहेर पडल्या नाहीत. अनेक बस थांब्यावर गर्दी होती. मुंबईकरांना कंत्राटी कामगारांनी आजही वेठीस धरले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कंत्राटी कामगारांच्या समन्वय समितीची बैठक झाली. काल रात्रीही मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली. मागण्याबाबत अजून स्पष्ट चित्र आलेले नाही. काही लेखी दिलेले नाही. मात्र ठाणे येथील आनंद आश्रम मध्ये महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून मागण्यांची पूर्तता होईल. असा विश्वास समन्वय समितीला वाटत आहे.
‘समान काम, समान वेतन’ तत्व राबवा, कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या, वेतनवाढ द्या, दरवर्षी वेतनवाढ द्या, दिवाळी बोनस द्या, भरपगारी रजा मोफत बस पास अशा मागण्यांसाठी ‘बेस्ट’ कंत्राटी कामगारांनी २ ऑगस्टपासून ‘काम बंद आंदोलन’ सुरू केले आहे.
‘बेस्ट’मध्ये वाहतूक सेवा पुरवणार्या डागा ग्रुप, हंसा, मातेश्वरी, टाटा, ओलेक्ट्रा, स्विच मोबॅलिटी या कंपनींच्या माध्यमातून काम करणार्या कंत्राटी कामगारांनी हे ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. सुमारे ९००0 कामगार या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ‘बेस्ट’ची सेवा कोलमडली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी रात्री उशिरा चर्चा झाली.
मंगळवारी दिवसभरात कंपन्यांकडून लेखी आश्वासन मिळाले नसल्याने संपाबाबत संभ्रम होता. मात्र लेखी आश्वासन मिळाले नसले तरी मागण्या पूर्ण होणार असल्याचा दावा करीत संप मागे घेत असल्याचे ‘बेस्ट’ कंत्राटी कामगार समन्वय समितचे समन्वयक विकास खरमाळे यांनी सांगितले.
चर्चेचे गु-हाळ
कंत्राटी कामगारांकडून एकूण २० आगारांत हे ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र मंगळवारी उशिरापर्यंत लेखी आश्वासनासाठी कंपन्यांसोबत चर्चेचे गुर्हाळ सुरू होते. यातच आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शिवाय समन्वय समितीच्या माध्यमातून संप मिटल्याची घोषणा करण्यात आली. मात्र आजही अनेक डेपोत कंत्राटी कामगार कामावर परतले नसल्याने संभ्रम निर्माण झाला.
100 टक्के प्रवर्तन, बेस्ट प्रशासनाचा दावा
मुंबईत आज सकाळी १० वाजेपर्यंत ‘बेस्ट’च्या एकूण ३०४० गाड्यांपैकी सकाळी २९६२ म्हणजेच ९८ टक्के गाड्या रस्त्यावर धावल्या. तर सायंकाळी १०० टक्के गाड्या चालवण्यात आल्या. ८५ टक्के गाड्या कंत्राटी कामगारांकडून चालवण्यात आल्या. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या २१२ गाड्याही चालवल्या जात आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.