भाईंदर : उत्तन येथील कचराभुमीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. अवघ्या महिन्याभरात कचराभुमीला दुसर्यांदा आग लागल्यामुळे स्थगित केलेले कचर्याच्या गाड्या अडवण्याचे आंदोलन पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले आहे.
उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर साठवण्यात आलेल्या कचर्याला बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे निर्माण झालेला धूर उत्तनसह आसपासच्या गावांमधून पसरल्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला. रात्री उशीरापर्यंत ही आग सुरु होती. आगीची माहिती मिळताच मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या कचराभुमीवर दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले होते.
फेब्रुवारी महिन्याच्या नऊ तारखेला देखील रात्रीच्या सुमारास कचराभुमीला भीषण आग लागली होती. त्यावेळी ही आग सलग तीन ते चार दिवस धुमसत होती. त्यावेळी देखील धुराचा प्रचंड त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागला होता. गेल्या एक वर्षाच्या काळात कचराभुमीला पाच वेळा आग लागली असल्यामुळे मिरा भाईंदर शहराचा कचरा उत्तन गावात नको अशी आक्रमक भूमिका घेत जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून कचर्याच्या गाड्या अडवण्याचा इशारा ग्रामस्थांनी त्यावेळी दिला होता.
मात्र त्यानंतर महापालिका आयुक्त, महापौर यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित केली आणि कचरा प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी महापालिकेकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर समाधान व्यक्त करत ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले होते. विशेष म्हणचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने बुधवारीच मिरा भाईंदर शहरात महापालिका सुरु करत असलेल्या बायोगॅस प्रकल्पांची पहाणी केली होती.
मात्र दुपारी कचराभुमीने पुन्हा पेट घेतला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आता कचर्याच्या गाड्या अडवण्याव्यतिरिक्त पर्याय राहिलेला नाही असे जन आक्रोश मोर्चाने जाहीर केले आहे. आंदोलनाचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल असे जन आक्रोश मोर्चाचे निमंत्रक लिओ कोलासो यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.