मुंबईत १० हजार बॉटल्स रक्तसाठा उभा करणार; काँग्रेसचा निर्धार

मुंबईत १० हजार बॉटल्स रक्तसाठा उभा करणार; काँग्रेसचा निर्धार

काँग्रेसकडून रक्तदान मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेची सुरूवात उत्तर मुंबईतून करण्यात येईल. मुंबईच्या आयुक्तांनी सांगितलं आहे की रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही 10 हजार बॉटल्स रक्तसाठा गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ ते ३० एप्रिल या काळात ही मोहीम राबवण्यात येईल. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांच्या मालाड मालवणी मतदारसंघातून याला सुरुवात होणार आहे. १२ तारखेपासून या मोहिमेला सुरुवात होईल. मुंबईतील अनेक अल्पसंख्याक समाज असणाऱ्या भागात रक्तदान कॅम्प होतील", अशी माहिती काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.

"आम्हाला दुकान व्यवसायिकांनी येऊन भेट दिली. त्यांनी काही अडचणी आम्हांला सांगितल्या. स्वीगी, झोमॅटो यांना जे नियम लागू करण्यात आले आहेत, ते नियम आम्हालादेखील लागू करा, अशी मागणी त्यांनी केली. ही योग्य मागणी आहे. सध्या जे नियम लागू करण्यात आले आहेत. ते आवश्यक आहेत कारण बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण इतरही गोष्टी पाहणं गरजेचं आहे", असं ते म्हणाले.

"मुंबई आणि महाराष्ट्रातील छोटया-मध्यम उद्योगांना पूर्ण लॉकडाउन परवडणारा नाही. निर्बंधांसह व्यवसायाला परवानगी दिली पाहिजे. हा गंभीर आर्थिक मुद्दा आहे. अर्थव्यवस्था ढासळली, तर कोरोनापेक्षा जास्त बळी जातील" असेही भाई जगताप यांनी नमूद केले.

"महाराष्ट्राबाबत बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नागरिकांचे लसीकरण व्हावे असे वाटत नाही का? दीड दिवस पुरेल इतकाच लससाठा मुंबईत बाकी आहे. त्यावर फडणवीस का बोलत नाहीत? सरकार चा कारभार फडणवीस यांना बघवत नाही. त्यामुळे ते काहीही बोलतात. फडणवीस नक्की काय बोलतात, ते त्यांना तरी कळते का?", असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com