Mumbai Political News: भाजपला मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघ लढायची इच्छा होती; पण तीनच मिळणार आहेत.
त्यातच गजानन कीर्तिकर यांच्या ईडी कारवाईविरोधातील मुलगा अमोलला पाठीशी घालणाऱ्या वक्तव्यानंतर अडचणीत आलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊ नका, ती अभिनेते शरद पोंक्षे किंवा निष्कलंक चेहरा असलेल्या डॉ. दीपक सावंत यांना द्या, असा आग्रह भाजपने कायम ठेवला आहे.
दक्षिण मुंबई शिवसेना शिंदे गटाला द्यावी लागणार असल्याने तेथे मिलिंद देवरा यांना लढवले जाते की यशवंत जाधव यांना, असा प्रश्न आहे. रवींद्र वायकर, यशवंत जाधव हे दोघेही मुंबईत स्थायी समितीचे अध्यक्षपद सांभाळलेले नेते; मात्र त्यांची प्रतिमा चांगली नसल्याने भाजपला लोकसभेत अन् नंतरही त्यांच्यावरील आरोपांचा त्रास होऊ शकतो. दक्षिण मुंबईत राहुल नार्वेकर यांची उमेदवारी चांगली होती; मात्र शिंदे गटाला ती जागा जाणार आहे.
दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम हे दोन मतदारसंघही शिवसेनेकडे जातील. भाजपने उत्तर मुंबईत पियूष गोयल यांना, तर उत्तर पूर्व मुंबईत मिहीर कोटेचा यांना उमेदवारी घोषित केली आहे. आता उत्तर मध्य हा एकच मतदारसंघ मिळाला; तर तेथे मराठी चेहरा उतरवणे आवश्यक ठरेल. पूनम महाजन की आशीष शेलार, असा तो वाद आहे.
लोकसभा महत्त्वाची असतानाच आर्थिक राजधानीवर झेंडा कुणाचा, हे महत्त्वाचे ठरणार आहे; अन् लोकसभेपाठोपाठ विधानसभा, महापालिका निवडणुकीत महायुतीला यश मिळवायचे असल्याने भाजप शिवसेनेत कुणी किती जागा लढायच्या, यावर वाद सुरू आहे.
नाशिक मतदारसंघ शिवसेनेला, तर सातारा आणि रत्नागिरी भाजपला मिळेल. नाशिक गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान होईल, असे दिसते. ठाणे शिवसेनेला द्यावेच लागले, तर पालघर भाजप स्वत:कडे ठेवेल, असे समजते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.