मुंबई यंदाही तुंबणार!

mumbai rain
mumbai rain

मुंबई : मुंबईला पुरापासून मुक्त करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. या नियोजनानुसार गेल्या दोन वर्षांत २७३ ठिकाणांमधील २०४ ठिकाणे पूरमुक्त केली आहेत. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी आणखी ४५ ठिकाणे पूरमुक्त केली जाणार आहेत; मात्र उर्वरित २४ ठिकाणांची कामे पुढील दीड वर्षांत पूर्ण होणे कठीण असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे यंदाही हिंदमाता, लोअर परळ, महालक्ष्मी, अंधेरी या ठिकाणांसह मुंबईत पाणी तुंबण्याचे संकट कायम आहे.


पर्जन्यवृष्टीच्या काळात पाणी तुंबण्याच्या समस्येवर अजूनही पालिकेला मात करता आलेली नाही. या समस्येतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन ती पूरमुक्त करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत पाणी साचणाऱ्या २७३ ठिकाणांमधील २०४ ठिकाणे कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा पावसाळ्याआधी ४५ ठिकाणे पूरमुक्त करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे; मात्र हिंदमाता, लोअर परळ, महालक्ष्मी, अंधेरी, वरळी, दादर टीटी, परळ आदी महत्त्वाच्या २४ ठिकाणांची कामे पुढील एक ते दीड वर्षात पूर्ण होणे अशक्‍य आहे. तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबईत कोट्यवधी रुपये खर्च करून पंपिंग स्टेशन बांधण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता बहुतांश ठिकाणी पाणी साचून राहत नसल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे.

असा आहे ‘ॲक्‍शन प्लॅन’
भरतीचा प्रभाव कमी करणे आणि सखल भागात साचणारे पाणी कमी करण्यासाठी नदी, नाले, खाडी, समुद्राच्या पातमुखांवर गेट पंप बसवण्यात येणार आहेत. शिवाय नाल्यांमध्येच गेटपंप बसवण्याबाबत नियोजन सुरू असून यामुळे तिवर तोडण्याची आणि पंपिंग स्टेशनसाठी जागेचीही गरज भासणार नाही. समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी विलेपार्लेजवळील ईर्ला, वरळीजवळील लव्हग्रोव्हसारख्या मोठ्या नाल्यांवर ‘बॅक रेक स्क्रिन्स’ बसवण्यात येणार आहेत; तर पाणी निचऱ्याच्या ठिकाणी फ्लड गेट बसवणार आहे. रेल्वे मार्गावरच्या मोठ्या मोऱ्यांमधील गाळ सक्षमतेने काढण्यासाठी ‘हायड्रोझूम कॅमेरा’ आणि रेल्वे-रस्ते मार्गावरील मोठ्या मोऱ्यांमधील गाळ काढण्यासाठी ‘रिमोट कंट्रोल्ड स्विंगलोडर’ मशीनची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी २.६८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मोगरा, माहुल पंपिंग स्टेशनसाठी १५० कोटी
मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी अंधेरीत मोगरा आणि माहुल येथे पंपिंग स्टेशन सुरू करण्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. यासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील सर्वांत महत्त्वाच्या मिठी नदीच्या सौंदर्यीकरणाच्या कामांतर्गत प्रस्तावित उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भविष्यात यामुळे मुंबईकरांना पाणी साचण्यातून दिलासा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com