अलिबाग : शिधावाटप केंद्रांवर होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने शिधावाटप पत्रिका आधारकार्डची जोडणी सक्तीची केली होती. त्याचबरोबर धान्य वितरणात सुलभता यावी यासाठी लाभार्थ्याला बारकोड दिले होते. यासाठी पुरवठा विभागाने पाच वर्षांत अनेक विशेष मोहिमा राबवल्या होत्या. त्यानंतरही काहींनी याकडे दुर्लक्ष केले. अशा रायगड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे कोरोनाचा धक्का सहन करणारे हे लाभार्थी हतबल झाले आहेत.
ेकोरोनाच्या साथीत कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी प्रत्येक महिन्याच्या धान्याबरोबर शिधावाटप पत्रिकेवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तींना पाच किलो धान्य देण्याचे सरकारने जाहीर केले आहे, परंतु यापासून अनेक जण दूर आहेत. एकीकडे प्रशासन परराज्यातील नागरिकांना स्वतःहून जाऊन धान्य, जेवणाची व्यवस्था करीत आहे; मात्र जिल्ह्यातील पत्रिकाधारक नागरिकांना बारकोड आणि ऑनलाईन नोंदणी नसल्याने धान्यापासून वंचित ठेवत आहे.
शिधावाटपातील काळाबाजार रोखण्यासाठी बारकोडची अद्यावत प्रणाली पुरवठा विभागाने राबवली आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत अंत्योदय, केशरी शिधावाटक पत्रिकांवर बारकोड असेल आणि ऑनलाइन नोंदणी केली नसेल तरी धान्य रेशन दुकानावर मिळणार आहे. तसेच ज्याची नोंद किंवा बारकोड नसेल तरी कोणीही धान्यपासून वंचित राहणार नाही.
- मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी
शिधावाटप पत्रिकेला आधार जोडलेले नाही आणि ते धान्यापासून वंचित आहेत त्यांचे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून अथवा ऑफलाईन पद्धतीने किंवा इतरांना जसे प्रशासन व सामाजिक संस्था धान्य पुरवठा करते अशा पद्धतीने त्याची समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत; तर शासन स्तरावरही याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड
......
रेशन कार्डधारकांची आकडेवारी
रायगड जिल्ह्यातील शिधा पत्रिका धारक : 7 लाख 5 हजार 224
धान्य देण्यात येणारे पत्रिका धारक : 3 लाख 52 हजार 770
अत्योदय : 71 हजार 547
केशरी (विनाधान्य) पत्रिका : 3 लाख 358
शुभ्र पत्रिका : 51 हजार 136
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.