नागरिकांना फोन करण्यासाठी जावे लागते...२० किलोमीटर!

नागरिकांना फोन करण्यासाठी जावे लागते...२० किलोमीटर!
नागरिकांना फोन करण्यासाठी जावे लागते...२० किलोमीटर!

पालघर : केंद्र सरकारकडून ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न दाखवले जात आहे. या यंत्रणेचा जोरदार प्रचार आणि प्रसार करण्यावरही सरकार पुरेपूर लक्ष देत असले, तरी जव्हार तालुक्‍यातील अनेक गावे, आदिवासी पाड्यांना मोबाईल वा इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याने येथील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. दुर्गम भागांतील ही गावे आणि पाडे अजूनही मोबाईल ‘संपर्क क्षेत्राबाहेर’ असून एखादा महत्त्वाचा निरोप पाठवण्यासाठी माणसांचाच वापर करावा लागत आहे.

गुजरात, दादरा-नगरहवेली यांच्या सीमांना जोडून असलेली जव्हार तालुक्‍यातील वांगणी, रुईघर बोपदरी यांसह १० महसुली गावे आणि ३५ पाडे अशा आदिवासी गावपाड्यांमध्ये कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे ई-मेल, एसएमएस, व्हॉट्‌सॲप या गोष्टी दूरच राहिल्या; पण कुठलाही तात्काळ संपर्क करायचा असेल, तर या भागांत एखाद्याकडून निरोप दुसरीकडे पाठवला जातो. त्यामुळे महत्त्वाचा निरोप वेळेवर पोहोचत नसल्याचेही दिसून आले आहे. एखाद्याला तत्काळ दूरध्वनीवर संपर्क करायचा असेल, तर २० किलोमीटरवर दादरा-नगरहवेलीला जावे लागते.

सीमा भागांतील ही गावे खोल दऱ्याखोऱ्यांत वसलेली आहेत. त्यामुळे तिथे मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने आरोग्यासंदर्भातील अडचणी भेडसावतात. एखादी व्यक्ती आजारी असल्यास डॉक्‍टर किंवा रुग्णवाहिका बोलावणेही कठीण होते. १०८ किंवा १०४ वर संपर्क करून रुग्णवाहिकेची मागणी करणारी योजनाही नेटवर्क नसल्याने येथे फोल ठरली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची कसरत
नेटवर्क नसल्याने या भागांत सरकारची कामे करणाऱ्या यंत्रणांना मोठ्या कसरतीने कामे करावी लागत आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आरोग्य विभागाचे हिवताप निवारण कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, आश्रमशाळा शिक्षक, अन्य सरकारी क्षेत्रांत कामे करणाऱ्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती देणे, पुरवणे कठीण झाले आहे. शिवाय कुठलेही नेटवर्क नसल्याने अनेक सुविधांपासून मुकावे लागत आहे.

जव्हार तालुक्‍यातील या भागांमध्ये मोबाईल नेटवर्क येत नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावांमध्ये एखादा रुग्ण आजारी पडला, तर १०८ रुग्णवाहिकेला दूरध्वनी करण्यासाठीही जवळपास १८ ते २० किलोमीटरवर जाऊन दूरध्वनी करावा लागत आहे किंवा निरोप देऊन रुग्णवाहिका मागवावी लागत आहे. या भागांमध्ये आश्रमशाळा आरोग्य पथक असून मोबाईल नेटवर्क येत नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- रतन बुधर, माजी जिल्हा परिषद सदस्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com