मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना थंडगार शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. हवेपासून पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, घाटकोपर आणि विक्रोळी या सहा स्थानकांवर एकूण १७ मेघदूत यंत्रे बसविण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातील प्रमुख सहा रेल्वे स्थानकावर १७ यंत्रे लावण्याकरिता मे. मैत्री अॅक्वाटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाच वर्षांसाठी मेघदूत यंत्रे उभारण्याचे कंत्राट दिले आहे. यातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत वर्षाला २५ लाख ५० हजार रुपयांचा महसूल जमा होणार आहे.
विशेष म्हणजे या १७ यंत्रामधून हवेतून पाण्याची निर्मिती होऊन पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच हवेपासून उपलब्ध झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकात पाच, दादर स्थानकात पाच, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकात प्रत्येकी एक, ठाणे स्थानकात चार आणि विक्रोळी स्थानकात एक अशी १७ यंत्रे बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचे शुद्ध आणि थंडगार पाणी मिळणार आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
आयआरसीटीसीच्या रेल्वे स्थानकातील वॉटर वेंडिंग मशीन आर्थिक गणित बिघडल्याने गेल्या अडीच वर्षांपासून बंद पडल्या आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर चकरा माराव्या लागत होत्या. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत होती. आता मध्य रेल्वेने १७ मेघदूत यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसांत ही यंत्रे स्थानकांवर बसवण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.