सध्या भारतात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतोय. पाच राज्यांमध्ये असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांचा आकडा रोज नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन न लावता लसीकरणावर भर देणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं. या मुद्द्यावर काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली. "संपूर्ण देशात आभाळ फाटलंय अशी स्थिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारला विविध धोरणांबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. पण विरोधकांकडून मात्र याबाबत राजकारण केलं जात आहे आणि थट्टा उडवण्याचं काम केलं जातंय", असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला.
"हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टदेखील केंद्र सरकारला सांगत आहे की भीक मागाव लागलं तरी मागा पण रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन राज्यांना पुरवा. कारण या उपाययोजना जर केंद्राकडून आधीच मिळाल्या असत्या, नीट लसी पुरवण्यात आल्या असत्या तर अशा विचित्र घटना पाहाव्या लागल्या नसत्या. देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे नियम केंद्र सरकार लावत आहे. महाराष्ट्राला कमी डेसिबल दाबाने ऑक्सिजन दिला जातोय हे आम्ही सांगत होतो. आता हायकोर्टानेही सांगितलं. आम्हाला असं वाटतं की जीवासंबंधी कोणीही राजकारण करू नये", असं स्पष्ट मत पटोले यांनी व्यक्त केलं.
"विरारला घडलेल्या प्रकरणात प्राण तर परत दिला जाऊ शकत नाही, पण दोषींवर मात्र नक्कीच कारवाई केली जाईल. तसेच राज्य सरकार यापुढे कडक धोरण राबवेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणावर चौकशी बसवली आहे. त्यात सदोष असेल तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार आहे. ज्यांच्यामुळे जीव गेला, त्याच्यावर कारवाई नक्कीच होणार. कोणालाही पाठीशी घालणार नाही", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.