शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज
मुंबई: गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आठवड्याच्या सुरूवातीला दणक्यात पुनरागमन केले. गेले दोन-तीन दिवस पावसाने सतत हजेरी लावली आहे. पावसाची रिपरिप मुंबईत दोन दिवस सुरु होती. आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि मुंबईकर सुखावले. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पनवेल, वसई, पालघर आणि रायगड पट्ट्यातही पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली. पुढील दोन दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाची हजेरी असणार आहे आणि काही भागात तर मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. (Rain Continues since 4 days Mumbaikars enjoying pleasant weather)
सोमवारपासून मुंबईत पावसाची ये-जा सुरु झाली. मंगळवारी आणि बुधवारीही दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती. मुंबईत बुधवारी शहर विभागात सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत 22.56 मि.मी, पूर्व उपनगरात 12.59 मि.मी आणि पश्चिम उपनगरात 19.31 मि.मी पावसाची नोंद झाली. दिवसभर मुंबईत पावसाचे ढग दाटून आले होते. मुंबईत बुधवारी कुलाबा येथे कमाल 28.2 आणि किमान 23.8 अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे कमाल 30 आणि किमान 23.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुढील दाेन दिवस पावसाची परीस्थिती अशीच राहणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, शनिवार पासून पुन्हा पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. जून महिन्यातील काही दिवस वगळता फारसा पाऊस झाला नाही. जुलै महिन्यांतदेखील पहिले दहा दिवस कोरडेच गेले होते. त्यामुळे नागरिकांना भर पावसातही कडक उन्हाचे चटके भोगावे लागले. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने सातत्याने हजेरी लावल्यामुळे वातावरण थंड आणि प्रसन्न झाले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.