गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांची संगत राऊतांनी सोडावी : शीतल गंभीर देसाई

भाजप मुंबई महिला मोर्चाचा शिवसेनेला टोला
Mumbai
Mumbaisakal

मुंबई : एसटी कामगारांचा गिरणी कामगार करताय का, असे विचारणाऱ्या संजय राऊत यांनी, गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांची संगत प्रथम सोडावी, असा टोला मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी लगावला आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीवरून संप सुरूच ठेवला आहे. कामगार संप मिटविण्यास तयार आहेत, पण काही नेते संपास चिथावणी देत आहेत, असे विधान राऊत यांनी केले होते. त्यासंदर्भात त्यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली होती. मुंबईत 1980 च्या दशकात झालेला गिरणी कामगारांचा संप अजूनही अधिकृतरित्या मागे घेण्यात आला नाही. मात्र यामुळे गिरण्या बंद पडल्या, तो व्यवसाय मुंबईबाहेर गेला व गिरणीमालकांनी गिरण्यांची जागा विकून गडगंज नफा कमावला. या प्रक्रियेत संप ताणल्यामुळे गिरणी कामगार मात्र देशोधडीला लागले. या घटनांना उद्देशून राऊत यांनी केलेल्या टीकेला श्रीमती देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Mumbai
शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देणारे जिरेनियम पीक;पाहा व्हिडिओ

संप दीर्घकाळ चालला व त्यामुळे गिरण्या बंद पडून जमिनी विकता आल्याने एका अर्थाने गिरणीमालकांचे उखळ पांढरे झाले. मात्र कामगारनेते व मालक यांच्या लढाईत भरडल्या गेलेल्या गरीब गिरणी कामगारांचे भले करणे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस सरकारला सहज शक्य होते. कामगारांना गिरण्यांच्या जागेवर घरे उभारून देणे सरकारला सहज शक्य होते. मात्र मुळात कायद्याचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कागदी आदेशावर तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेल्या तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांमुळे गिरणी कामगारांच्या हातात मातीच आली, असेही श्रीमती देसाई यांनी दाखवून दिले आहे.

कोणताही वरिष्ठ अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या संमतीशिवाय असे वाटेल ते आदेश काढूच शकत नाही, हे सत्य आहे. तो आदेश रद्द करण्याचे धाडसही तेव्हाच्या सरकारमध्ये नव्हते. या आदेशाला सरकारचाच मूक पाठिंबा असल्याने अखेर न्यायालयातही कामगारांना यश मिळाले नाही व ते कामगार देशोधडीला लागले. हा इतिहास राऊत एवढ्या लौकर विसरले हे आश्चर्यकारक आहे. अर्थात गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांची संगत आता शिवसेना सत्तेसाठी करीत आहे, हे आश्चर्यकारक मुळीच नाही, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

Mumbai
नागपूर : गृह विभागाच्या आदेशाला पोलिसांनी केले तडीपार!

अजूनही उरलेसुरले गिरणी कामगार घरांसाठी म्हाडाचे उंबरठे झिजवीत आहेत. गिरणगावाच्या परिसरातच पत्रकार म्हणून राऊत यांची कारकीर्द घडली आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींचे ते देखील साक्षीदार आहेतच. मात्र आता ते वाईट साथीदारांबरोबर असल्याने गिरणी कामगारांचे दुःख त्यांना समजत नाही. गिरणी कामगारांचे दाखले देताना राऊत यांना काही दुःख होत असेल असे वाटत नाही. पण त्यांना दुःख होत असेल तर गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी अजूनही त्यांनी धडपड करावी. तसेच एसटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखणी आणि वाणी झिजवावी, अशा शब्दांत श्रीमती देसाई यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com