INSIDE STORY : 'ती' सात ७ बेटं, ज्यांना आपण आज मुंबई म्हणतो...

mumbai
mumbai

मुंबई: मुंबई म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात उंचच उंच इमारती, बॉलिवूड, लोकांची गर्दी, अविरतपणे धावणारी लोकल आणि तो अथांग समुद्र. देशभरातून लाखो लोकं मुंबईत रोजगारासाठी येतात आणि इथलेच होऊन जगतात. देशाची आर्थिक राजधानी असलेली ही मुंबई जगभरातून येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यात सामावून घेते हे तुम्हाला माहितीच आहे. मात्र अरबी समुद्राच्या किनारी वसलेल्या या मायानगरीची निर्मिती कशी झाली ? मुंबई हे शहर कसं तयार झालं ? हे आम्ही आज तुम्हाला  सांगणार आहोत.

मुंबई शहर जितकं मोठं आहे तितकीच विविधता या शहरामध्ये आहे. मुंबई हे समुद्री मालवाहतुकीचं देशातलं सर्वात मोठं बंदर आहे. त्यामुळे मुंबईला 'शांघाय ऑफ इंडिया' असंही म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का आपली मुंबई हे फक्त एक बेट नाहीये तर तब्बल ७ बेटं मिळून मुंबई शहर तयार झालंय. कोणती आहेत ही ७ बेटं हे आपण आज जाणून घेणार आहोत. 

(१) बॉम्बे बेट: 

या बेटाला 'Isle of Bombay' असंही संबोधलं जात होतं. ब्रिटिशांच्या काळात या बेटाला मध्यवर्ती बंदर म्हणून मान्यता होती. सध्याचा डोंगरी ते मलबार हिलचा भाग म्हणजे हे बेट होतं. मौर्यांच्या काळात हे बेट पश्चिम भारतात बुद्ध धर्माचं शिक्षण देण्याचं महत्वाचं ठिकाण होतं. या ठिकाणची संपन्नता आणि समुद्र किनारा बघून जगातल्या काही महासत्ता या बेटाकडे आकर्षित झाल्या. ब्रिटिशांच्या आधी या बेटावर दिल्ली, गुजरात आणि बहामनी या साम्राज्यांनी राज्य केलं.  

(२) माहीम:

१३ व्या शतकात राजा भीमदेव यांचं राज्य होतं. त्यावेळी माहीम त्यांची राजधानी होती. तर प्रभादेवी इथे त्यांचं न्यायालय होतं. त्यांनतर माहीम बेटावर मुस्लिमांचं राज्य प्रस्थापित झालं. त्याची चिन्हं आजही आपल्याला माहीम दर्गा आणि मस्जिद यांच्या स्वरूपात पाहायला मिळतात. १५४३ साली पोर्तुगीजांनी हे बेट आपल्या ताब्यात घेतलं. मात्र या बेटासह आणखी ६ बेटं त्यांना ब्रिटिश राजाला हुंडा म्हणून द्यावी लागली. माहीम किल्ला हा पोर्तुगीजांपासून संरक्षण मिळावं म्हणून ब्रिटिशांकडून बांधण्यात आला होता. माहीम हे मुंबईच्या सर्वात पश्चिमेकडील बेट असल्यामुळे या बेटाला अधिक महत्व होतं. 

(३) कुलाबा:

ब्रिटिशांच्या आधी या बेटावर पोर्तुगीजांचं राज्य होतं. पोर्तुगीज या बेटाला 'कँडील' बेट असं संबोधत होते. १५३४ साली पोर्तुगीजांनी हे बेट जिंकलं आणि यावर ताबा मिळवला. पोर्तुगीजांनी या बेटावर तब्बल १०० वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं. ब्रिटिशांनी या बेटावर १६७२ ते १८६३ पर्यंत राज्य केलं. त्यांनतर १८७२ साली या बेटाला वेगळा नगरपालिकेचा भाग म्हणून मान्यता देण्यात आली. या भागात आजही बरेच संग्रहालय आहेत. कुलाबा म्हणजेच कोळी बांधवांचं राहण्याचं ठिकाण अशीही या भागाची ओळख आहे.

(४) परळ:

परळ हे सर्व बेटांमध्ये सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध होतं. माहीमप्रमाणेच परळही १३ व्या शतकात राजा भीमदेव यांच्या राज्यात होतं. मात्र त्यांनतर पोर्तुगीजांनी हे बेट आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या काळात हे बेट धार्मिक विधी करणाऱ्या पुजाऱ्यांना देण्यात आलं होतं. बॉम्बेचे ब्रिटिश राज्यपाल विलियम हॉर्नबी यांनी राहण्यासाठी परळ हे बेट निवडलं त्यामुळे परळला अधिक महत्व प्राप्त झालं. मुंबईत सध्या मोठमोठ्या इमारती परळमध्येच आहेत.

(५) माझगाव: 

माझगाव म्हणजे मासेमारी करणाऱ्या लोकांचं गाव. हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. पोर्तुगीजांनी या बेटावर अनेक चर्च उभारले आहेत. १७ व्या शतकानंतर या बेटावर ब्रिटिशांचं राज्य आलं. हे बेट त्या काळात मासेमारी आणि मालवाहतुकीचं केंद्र होतं. 

(६) वरळी:

हे बेट त्याकाळी  शहराच्या राजधानीला जोडणारं विशेष केंद्र होतं. समुद्रात दगडांवर बांधण्यात आलेला हाजी अली दर्गा इथेच आहे. ब्रिटिशांच्या बांधण्यात आलेलं पंपिंग स्टेशनही वरळीत आहे. सध्या वरळीत मोठ्या प्रमाणावर कार्यालयं आणि उद्योगधंदे आहेत. 

(७) ओल्ड वुमन्स बेट:

हे बेट इतर ६ बेटांच्या तुलनेत सर्वात लहान बेट. हे बेट कुलाब्याच्या जवळ आहे त्यामुळे याला लिटिल कुलाबा असंही म्हणतात. कोळी बांधव इथे मोठ्या प्रमाणावर राहतात. 

ही ७ बेटं मिळून आपली मुंबई तयार झाली आहे. ब्रिटिशांच्या काळात या सातही बेटांना एकत्रित करून बॉम्बे असं नाव देण्यात आलं होतं.       

mumbai is made up of 7 islands read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com