वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेलीच, कल्याणकरांची पुन्हा परीक्षा

वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेलीच, कल्याणकरांची पुन्हा परीक्षा

कल्याण : कल्याण पूर्वेकडील 'एफ' केबिन परिसरातील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी मंगळवारपासून (ता. 6) खोदकामाला सुरुवात झाली. वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले असले, तरी खोदकामाच्या पहिल्या दिवसापासूनच कल्याणकरांना कोंडीचा सामना करावा लागला. आधीच पत्रीपूल परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण असताना या रस्तेकामामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास खोळंबा होऊन नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.

कल्याण पूर्वमधील "एफ' केबिनजवळील स्व. आनंद दिघे उड्डाणपूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मंगळवारपासून या रस्त्याच्या खोदकामास सुरुवात झाली. तत्पूर्वी, वाहतूक विभागाने पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. दरम्यान, खोदकामाच्या पहिल्या दिवसापासून कल्याणकरांना कोंडीचा सामना करावा लागला. 

अनेक दुचाकी आणि कारचालकांनी पुलाच्या बाजूच्या लोकवस्तीमधून प्रवास सुरू केल्याने तेथेही वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याचे चित्र दिसले. दरम्यान, बुधवारी (ता. 7) सकाळपासून पत्रीपूल ते कचोरे आणि पत्रीपूल सूचकनाका परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या रांगा लागल्या. त्यामुळे पत्रीपुलाच्या कामामुळे त्रासलेल्या वाहनचालकांना आगामी काळात आणखी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. 

केडीएमसीने समन्वय अधिकारी नेमावा : सुखदेव पाटील 
कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. ठाणे महापालिकेच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली पालिकेने समन्वय अधिकाऱ्याची (इंजिनिअर) नेमणूक करावी, अशी मागणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी केली आहे. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मंगळवारी (ता. 6) पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठक आयोजित केली होती. यात पालिका अधिकारी, वाहतूक पोलिस आणि आरटीओ अधिकारी सहभागी झाले होते. 

रस्त्याचे काम थांबवण्याची मागणी
कल्याणमधील पत्रीपुलाचे काम अधर्वट असल्याने आधीच शहरात वाहतूक कोंडी होत आहे. त्यात कल्याण पूर्व एफ केबिनजवळील रस्ते बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे वाहतूक कोंडीत हाल होत आहेत. ते टाळण्यासाठी सिमेंट रस्त्याचे काम तात्पुरते थांबवा, अशी मागणी कॉंग्रेस कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे. कल्याण पश्चिम-पूर्वेला जोडणाऱ्या स्व. आनंद दिघे उड्डाणपुलाजवळील रस्ते खोदून ते सिमेंटचे बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी रस्ता आणि पूल वाहतुकीला बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांना पर्यायी मार्ग नसल्याने उल्हासनगरचा मोठा फेरा घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याची दखल घेऊन पत्रीपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी मागणी सचिन पोटे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी खोदकाम सुरू झाले आहे. आनंद दिघे पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असून हा रस्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करू. बाजूच्या वस्तीमधून वाहने जात असतील, तर स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ. 
- सुभाष पाटील, कार्यकारी अभियंता, केडीएमसी 

रस्ते खोदकामामुळे पुलाच्या खालच्या बाजूने वाहनांची वाहतूक होते. काल पहिल्याच दिवशी झालेल्या कोंडीने स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. यासाठी वाहतूक विभागाने येथील वाहतुकीचे नियोजन करावे. 
- निखिल टोकेकर, स्थानिक नागरिक 

---------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com