होय, शिवसेना बदलतेय!

काळानुसार सगळेच बदलते. तसा राजकीय पक्षही बदलतो. शिवसेनाही पक्ष म्हणून बदलत आहे, असे ठाम प्रतिपादन शनिवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. पक्षात बदल होतच असतात, पण आत्मा तोच असतो. जनसेवा हा शिवसेनेचा आत्मा आहे. तो कोविड संकटकाळातही नागरिकांनी अनुभवला, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमांतर्गत संवाद साधताना पेडणेकर यांनी राजकीय घडामोडी, प्रशासकीय कामकाज, आगामी निवडणूक, विरोधक इत्यादी विविध मुद्द्यांवर साडेतोड भूमिका मांडली.
kishori pednekar
kishori pednekarsakal

काळानुसार सगळेच बदलते. तसा राजकीय पक्षही बदलतो. शिवसेनाही पक्ष म्हणून बदलत आहे, असे ठाम प्रतिपादन शनिवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. पक्षात बदल होतच असतात, पण आत्मा तोच असतो. जनसेवा हा शिवसेनेचा आत्मा आहे. तो कोविड संकटकाळातही नागरिकांनी अनुभवला, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमांतर्गत संवाद साधताना पेडणेकर यांनी राजकीय घडामोडी, प्रशासकीय कामकाज, आगामी निवडणूक, विरोधक इत्यादी विविध मुद्द्यांवर साडेतोड भूमिका मांडली.

कोविड काळात तुम्ही स्वत: रस्त्यावरून उतरून काम केले...

सर्व योगायोग असतो. परिचारिका म्हणून काम केल्याने वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव होता. त्यामुळेच कोविड संकटकाळात हिमतीने काम करता आले. प्लेगची साथ आली तेव्हा मरणारे उंदीर तरी दिसत होते; मात्र कोरोना विषाणू नजरेस पडत नव्हता. भीती होती, उपचार माहीत नव्हते, पण शहराचा प्रथम नागरिक म्हणून असलेली जबाबदारी टाळता येणारी नव्हती. त्यामुळे योग्य काळजी घेऊन वेळ पडेल तेथे पीपीई किट घालून काम करत होते. सुरुवातीपासूनच मी म्हणत होते, की कोरोना साखळी तोडण्यासाठी घरातच थांबायला हवे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस आणि सफाई कामगारांबरोबरच इतर आघाड्यांवरील कर्मचारी-अधिकारी रस्त्यावर काम करत होते. त्यांच्याबरोबर माझेही काम सुरू होते. शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण दुसऱ्याच्या घरात, अशी भूमिका संकट काळात घेऊन चालणार नव्हती.

योद्ध्यांना धीर कसा दिला?

कोरोना विषाणूमुळे जग बंद पडले होते. डॉक्टर-परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण होते, पण त्यांनी मोठ्या हिमतीने काम केले. परिचारिकांची संख्या कमी पडेल म्हणून नर्सिंगच्या विद्यार्थिनींची मदत घ्यायचे ठरले, पण त्यांच्या मनातील भीती घालवणे गरजेचे होते. म्हणून स्वत:च महापौरपदाची झूल बाजूला ठेवून परिचारिकेचा गणवेश घालून त्यांच्यासमोर गेले. त्यांना कोविडविरोधात लढायला सांगत असताना मी स्वत: मागे राहून कसे चालेल?

तुम्ही कठोर निर्णय घेतले...

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या प्रमाणात रुग्णालयातील बेड कमी पडू लागले होते. अशा परिस्थितीत काही रुग्ण गरज नसतानाही आयसीयूतील बेड अडवून ठेवत होते. त्यासाठी हे पाऊल उचलावे लागले. अशा रुग्णांचे वैद्यकीय अहवाल तपासून तात्काळ निर्णय घेता येत होता.

तुम्ही रस्त्यावर उतरून काम करीत असताना मुख्यमंत्री मात्र घरात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत होता.

आम्ही सैनिक आहोत. महापौर हाही शहराच्या हितासाठी झटणारा सैनिकच असतो. मुख्यमंत्री-पंतप्रधानांकडे ताफा मोठा असतो. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना कर्मचारी आणि सुरक्षेचा मोठा ताफा सोबत असतो. कोविडच्या परिस्थितीत असा ताफा घेऊन फिरणे योग्य होते का? तंज्ञत्रानामुळे कामेही सहज होत होती. मुख्यमंत्री मुंबईसह राज्यावर लक्ष ठेवून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे इत्यादींचे मुंबईसाठी नेहमीच सहकार्य होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत म्हणून ही भूमिका नाही, तर देवेंद्र फडणवीस जरी आताच्या परिस्थितीत मुख्यमंत्री असते तरी माझे हेच मत असते.

kishori pednekar
बोरिवलीकरांवर का आली 'No Kissing Zone' सूचना लिहिण्याची वेळ?

कोविड काळात आरोप झाले...

विरोधक त्यांचे काम करत होते. ते योग्य भूमिका पार पाडत होते. आम्ही आमचे काम करत होतो. कोरोना मृतदेह ठेवण्याच्या बॉडी बॅग खरेदीवरही आरोप झाले. तेव्हा मीच म्हटले, की मी झोपते बॉडी बॅगमध्ये. वरून पाणी ओता, मग समजेल त्या गळक्या आहेत का नाही? विरोधकांनी कितीही आरोप केले तरी त्यांना आमच्या कामातून प्रत्युत्तर दिले जात होते.

पूर्वीची शिवसेना बदलली आहे...

होय, शिवसेना बदलतेय. सर्वच ठिकाणी बदल होत आहेत. शिवसेनेचा जन्म झाला तेव्हाची आणि आताची परिस्थिती, काळ वेगळा आहे. त्यानुसार वागावे लागणार ना? आपल्या घरातही ५०-६० वर्षांपूर्वीची परिस्थिती नाही. घरातही बदल होतातच ना... राजकीय पक्षांचेही तसेच आहे. शिवसेना बदलत असली तर आत्मा जनसेवेचा होता. तो कायम राहणार. कोविड काळात शिवसैनिक, शाखाप्रमुखांनी अगदी स्मशानभूमीपर्यंत पोहचून नागरिकांना सहकार्य केले आहे.

kishori pednekar
वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण

खड्डे, पाणी तुंबणे अशा सर्वच समस्या रडारवर आहेत.

विरोधक आरोप करणारच. त्यांना उत्तर कसे द्यायचे हे ठरलेले आहे. निवडणुकीचे गणित त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरते. तसे ते ठरवले जाईल. पश्‍चिम बंगालमध्येही केवढी ताकद लावली होती, पण ममता बॅनर्जी एका ‘पाया’वर लढल्या आणि जिंकल्याही... प्रत्येक निवडणूक ही अवघडच असते. शिवसेनेमध्ये कधी फाजील आत्मविश्वास नसतो.

पालिकेच्या कामावर नेहमीच टीका होते.

कोविड काळात महापालिकेने त्यांचे काम दाखवून दिले आहे. मुंबईची आरोग्य व्यवस्था आमच्याही अपेक्षा-विचारांपेक्षा अधिक बळकट असल्याचे आढळले. काही ठिकाणी उणिवा असतात, त्या आहेतही. त्यात दुरुस्ती करता येते. आपले वेतन मुंबईतील करदात्यांच्या पैशांतून येते, अशी भावना ठेवून काम केले तर पालिकेचे काम अधिक मोठे होईल.

kishori pednekar
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबईत अनेक प्राधिकरणे आहेत...

मुंबईत आता एक खिडकी नियोजन होणे अवघड आहे, पण सर्व प्राधिकरणांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. काही लालफीतशाही आहे, पण त्यावरही तोडगा काढू शकतो.

  • महापौरांना अधिक अधिकार मिळायला हवेत. अगदी महापौर परिषदेचे फायदे-तोटे आहेत. त्याचा विचार करून निर्णय व्हायला हवा. नगरसेवक सूचना करू शकतात. काम करून घेऊ शकतात, पण या अधिकारात वाढ व्हायला हवी.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखर आहेत, पण त्यांच्या हाताखालची यंत्रणा गडबडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळेनुसार योग्य निर्णय आणि योग्य भूमिका घेतात. कधी ती आक्रमक असते तर कधी सामंजस्याची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com