मुंबई ः राजस्थानातील कोटा येथे आयआयटी, मेडिकल अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी गेलेले विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी एसटीच्या सुमारे 100 बसेस पाठवण्याचा विचार आहे. मात्र, एसटी महामंडळ सज्ज असून, काही तांत्रिक अडचणींमुळे राज्य शासनाने अद्याप आदेश दिले नसल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी दरवर्षी राजस्थानमधील कोटा येथे जातात. यावर्षी कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यात परत येण्यासाठी मागणी केली आहे.
संबधित बातमी वाचा - राजस्थानातून विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सरकारच्या आदेशास एसटीची नकारघंटा
या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली असल्याचे, मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी ट्विट सुद्धा केले आहे. मात्र, अद्याप या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यावर एसटी महामंडळ, परिवहन विभाग आणि राज्य सरकारचे एकमत होऊ शकले नसल्याचे दिसून येत आहे.
एसटी महामंडळाने आपल्या बसेस सज्ज करून ठेवल्या आहेत. विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन व्हावे यासाठी एसटी महामंडळाचे संपुर्ण नियोजन असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय होत नसल्याने या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे.
राजस्थान येथील कोटा येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज आहे. त्यासाठी बसेसची पण सोय झाली आहे. मात्र, अनेक तांत्रीक अडचणी असल्याने, राज्य शासनाकडून त्यावर निर्णय प्रलंबीत आहे.
- अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ
काय असु शकतात तांत्रिक अडचणी ?
राजस्थान येथील कोटा शहरात जातांना गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान असे तीन राज्य लागणार आहे. या तीनही राज्यातील राज्य परिवहन विभागाचे परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर 100 गाड्यांसोबत एसटीचे 200 चालक, यांत्रिकी कर्मचारी जाणार आहे. या दरम्यान तीनही राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याची मागणी होऊ शकते. ही प्रक्रिया परत येतांना सुद्धा एसटी कर्मचारी आणि संपुर्ण विद्यार्थ्यांना तपासणीला प्रत्येक ठिकाणी सामोरे जावे लागेल. धुळे येथे या विद्यार्थ्यांना आणण्यात येणार आहे. त्यानंतर विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्याचे आव्हान सुद्धा राज्य शासनासमोर राहणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.