परप्रांतीयांना न्याय, कोकणावर अन्याय! विशेष रेल्वे गाड्यांचा मुद्दा जाणार 'राज' दरबारी!

परप्रांतीयांना न्याय, कोकणावर अन्याय! विशेष रेल्वे गाड्यांचा मुद्दा जाणार 'राज' दरबारी!
परप्रांतीयांना न्याय, कोकणावर अन्याय! विशेष रेल्वे गाड्यांचा मुद्दा जाणार 'राज' दरबारी!

ठाणे : राज्य सरकारच्या धोरणशून्य कारभारामुळे सतत पाठपुरावा करूनही कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध झाली नाही. यामुळे सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. सरकारकडून न्याय मिळत नसल्याने कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ चाकरमान्यांना न्याय देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घालणार आहे. येत्या 15 ऑगस्टला राज यांची भेट घेऊन गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष कोकण रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख राजू कांबळे आणि सुजीत लोंढे यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया राबवूनही 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. राज्य सरकारने एसटी बससेवा सुरू केली, तरी समन्वयाअभावी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू होऊ शकल्या नाहीत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करावी, यासाठी जून महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. 

मात्र कोकणी जनतेला न्याय देण्यासाठी राज्य सरकार सक्षम नसून केवळ नियमांचे कागदी घोडे नाचवून सरकारने अन्यायच केल्याची भावना कोकणवासीयांची झाली आहे. राज्य सरकारने वेळेत नियमावली बनवून रेल्वे प्रशासनाकडे पाठवली असती, तर अनेक चाकरमानी कोकणात गणेशोत्सवाला जाऊ शकले असते; परंतु नियोजनशून्य कारभारामुळे चाकरमान्यांची निराशा झाली. तेव्हा आता कोकणातून परतीच्या प्रवासासाठी तरी रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे. कोकणवासीयांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घालण्यात येणार आहे. त्यानुसार, किमान परतीच्या प्रवासासाठी तरी रेल्वे सुरू करा, या मागणीसाठी येत्या 15 ऑगस्टला ठाण्यातील कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे पदाधिकारी "कृष्णकुंज'वर धाव घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

परप्रांतीयांना न्याय, कोकणावर अन्याय! 
गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत रेल्वे प्रवासाचे नियोजन करून, परतीच्या प्रवासाचीही विशेष काळजी सरकारने घेतली; मात्र कोकणी जनतेला दामदुप्पट प्रवास भाडे आणि ई-पासच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा राज्य सरकारकडून न्याय मिळण्याची कोणतीही शाश्वती नसल्याची भावना चाकरमान्यांची झाली आहे. 
------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com