मुंबई : आर्यन खान प्रकरणावरून आज सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी कसलीही भीडभाड न ठेवता एकमेकांवर अशा काही बोचऱ्या आरोपांची डायलॉगबाजी केली की त्यातून एखाद्या सनसनाटी बॉलीवूड चित्रपटासाठी सुरस रहस्यकथा मिळून सुपरहिट चित्रपटही निर्माण होऊ शकेल, अशी गमतीदार चर्चा आज सर्वसामान्यांमध्ये सुरु झाली.
केसाला धक्का लावाल तर याद राखा हिंमत असेल तर करून दाखवाच तोडपाणी करायला सांगणारे ब्लॅकमेलर आहेत ते तो लादेन होता तर हा दाऊद आहे का मुस्लिम म्हणून टीका होते. यापूर्वी तुम्हीही मुस्लिमांवर टीका करतच होता . शाहरूखने या नेत्यांना भाड्याने ठेवलंय का एरवी हिंदी चित्रपटात शोभणारी ही वाक्ये आज आर्यन खान च्या निमित्ताने राज्यात विविध राजकीय नेत्यांनी उच्चारली. ती ऐकणाऱ्या सर्वसामान्यांना या कोलाहलात आपलेच डोके गरगरत असल्याचा जणुकाही भास झाला.
कोणी आर्यन खान ला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, कोणी केंद्र सरकारवर आणि त्यांच्या तपासयंत्रणांवर टीका करीत आहे, काही नेत्यांची परस्परांमध्येच बाचाबाची सुरु झाली, पक्षीय-धार्मिक वाद मध्येच घुसडले, एकमेकांवर गांजा ओढल्याचे आरोप झाले, असे चित्र आज राज्यात दिसले. यामुळे कोण बरोबर आणि कोण चूक आणि हे असे का करतात, याबाबत लोकांचा चांगलाच गोंधळ उडाला.
संजय राऊत, नितेश राणे, नाना पाटोले, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, रामदास आठवले हे आजच्या शो चे सुपरस्टार होते. एनसीबीच्या समीर वानखेडेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा कार्यक्रम नबाब मलिक व अन्य नेत्यांनी बनवल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली. तर वानखेडे यांना कोणी हात लावू शकत नाही, हिंमत असेल तर तसे करून दाखवाच, असे म्हणत भाजपचे नितेश राणे मैदानात उतरले. वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर खबरदार, असा आवाज रामदास आठवले यांनीही दिला.
एनसीबी ने पकडलेला गांजा ते भाजपकडे देतात व त्या नशेत भाजप नेते बडबड करतात, अशी टपली संजय राऊत यांनी मारली. तर राऊत कुठल्या प्रकारचा गांजा ओढतात ते त्यांनाच विचारा, असे प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिले. बॉलीवूडला लुटण्याचे हे मोठे रॅकेट आहे, मोठ्यांना बदनाम करून पैसे उकळण्याचा हा धंदा आहे, असे नबाब मलिक म्हणाले. तर केंद्र सरकार अधिकाऱ्यांना हाताशी धरून तोडपाणी करायला सांगते, हे सरकार ब्लॅकमेलर आहे, अशी टीका नाना पाटोले यांनी केली. शाहरूखने पैशांच्या जोरावर राऊत, मलिक यांना भाड्याने ठेवले आहे का, असा टोला नितेश राणे यांनी मारला. सचिन वाझे हे लादेन आहेत का, असे मुख्यमंत्री विधीमंडळात म्हणाले होते, मग वानखेडे हे दाऊद इब्राहिम आहेत का, असे प्रत्युत्तरही राणे यांनी दिले.
मुंबई ड्रग्ज प्रकरण आर्यनला अडकवण्यासाठी केले आहे. हिंदु मुस्लीम तेढ उत्पन्न करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंद्रा बंदरात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते, तरुणांना ड्रग्जमध्ये बुडविण्याचे काम केंद्राचे भाजप सरकार करीत आहे, असाही आरोप पटोले यांनी केला. मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांच्यावर टीका होते, असा बचाव संजय राऊत यांनी केला. तर शिवसेनाही आतापर्यंत हिरवे, पाकडे असे शब्द वापरून मुस्लिमांवर टीका करीत होती, असे अतुल भातखळकर यांनी दाखवून दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.