भारतीय रेल्वेची १७४ वर्षे! पहिल्या रेल्वेला १४ डबे अन् ३ इंजिन; साहिब, सुलतान आणि सिंधूला दिलेली २१ तोफांची सलामी

भारतात पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे यादरम्यान धावली होती. सीएसएमटी ते ठाणे हे ३३.८ किमीचे अंतर पार करण्यासाठी त्या वेळी ५७ मिनिटे लागली होती.
174 years of Indian Railways first train had 14 coaches and 3 engines

174 years of Indian Railways first train had 14 coaches and 3 engines

Esakal

Updated on


नितीन बिनेकर, मुंबई, ता. १६ : आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे यादरम्यान धावली होती. या ऐतिहासिक घटनेला गुरुवारी (ता. १६) १७३ वर्षे पूर्ण झाली असून, भारतीय रेल्वेने १७४व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्या ऐतिहासिक घटनेच्या आठवणी जपणाऱ्या तीन लोकलगाड्या आजही नियमित वेळापत्रकानुसार धावत आहेत.

भारतात प्रशासकीय कारभार अधिक परिणामकारक हाकता यावा, यासाठी ब्रिटिशांनी १८३२ मध्ये देशात रेल्वेसेवा सुरू करण्याचा आराखडा तयार केला होता. त्यानुसार ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (जीआयपी) या कंपनीला मुंबईहून खानदेशच्या दिशेने ५६ किमी लांबीचा लोहमार्ग उभारण्याचे कंत्राट देण्यात आले. १४ नोव्हेंबर १८४९ रोजी केवळ ३० वर्षांच्या जेम्स जॉन बर्कले या ब्रिटिश अभियंत्यावर संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. ऑक्टोबर १८५१ मध्ये या मार्गाचे भूमिपूजन झाले आणि दोन वर्षांतच ऐतिहासिक दिवस उजाडला.

१६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी पहिली रेल्वेगाडी सीएसएमटीहून ठाण्याच्या दिशेने रवाना झाली होती. त्या घटनेची आठवण म्हणून मध्य रेल्वे आजही दुपारी ३.२८ वाजता सीएसएमटीहून ठाणे लोकल चालवली जाते. त्या वेळी सीएसएमटी ते कर्जतदरम्यान मागे-पुढे इंजिन लावून लोकल चालवली जायची. आजही त्याच मार्गावर दुपारी १.४० वाजता लोकलगाडी धावते. १९३० मध्ये सुरू झालेली मुंबई-पुणे डेक्कन क्वीन ही गाडीदेखील या इतिहासाचा भाग आहे. संध्याकाळी ५.१० वाजता सुटणाऱ्या या एक्स्प्रेसच्या अगोदर, आजही सीएसएमटीहून अंबरनाथकडे धावणारी डबलफास्ट लोकल ५ वाजता सुटते. ही लोकल आता एसी लोकलच्या स्वरूपात प्रवाशांची सेवा करत आहे.

साहिब-सुलतान-सिंधू आणि २१ तोफांची सलामी
पहिल्या रेल्वेगाडीला एकूण १४ डबे आणि ‘साहिब’, ‘सुलतान’ आणि ‘सिंध’ ही तीन इंजिने लावण्यात आली होती. या वेळी ४०० नागरिकांना आमंत्रण देण्यात आले होते. मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ हे या प्रवासातील मान्यवर प्रवासी होते. गाडी सुटताच २१ तोफांची सलामी देण्यात आली होती. सीएसएमटी ते ठाणे हे ३३.८ किमीचे अंतर पार करण्यासाठी त्या वेळी ५७ मिनिटे लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com