Loksabha Election: शिंदे पवारांच्या कात्रीत भाजप अडकणार? मित्रपक्षांच्या आग्रहाला मिळणार मान्यता?
Loksabha news: मोदी ब्रॅण्डची लोकप्रियता लक्षात घेता महाराष्ट्रात किमान दोन तृतीयांश म्हणजे ३२ जागा लढाव्यात, असे निष्कर्ष पाहणीतून पुढे आले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १५ जागा लढण्याची भूमिका अन् राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सात जागांसाठी धरलेला आग्रह या कात्रीत भाजप सापडला आहे.( loksabha news maharashtra)
शिवसेना महाराष्ट्रात आजवर किमान २३ लोकसभा मतदारसंघ लढत असताना १० किंवा १३ वर लढावे लागले तर उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती वाढेल, असा मुद्दा शिंदे गटाने मांडला आहे; तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरते मर्यादित राहायचे नसल्याने त्यांनी विदर्भ, मराठवाड्यात जागा द्या, अशी मागणी केली आहे. (maharashtra news)
दिल्लीतील बैठकीनंतर काल दिवसभर चाललेल्या शिंदे-फडणवीस-अजित पवार बैठकीत काही जागांवर तर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. नाशिक मतदारसंघात गोडसे हे विद्यमान खासदार निवडून येत नाहीत, असे सांगत राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला; तर विदर्भातही आमचा पक्ष दिसायला हवा, असे सांगत बुलडाणा मतदारसंघ हवा, ही मागणी केली.(ekanth shinde and ajit pawar)
प्रतापराव जाधव या शिवसेनेतील विद्यमान खासदारांनी आता अजित पवारांसमवेत असलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना हरवले होते. गडचिरोली जागेवर भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने आता आमच्या धर्मरावबाबांना संधी नाही. त्यामुळे बुलडाणा सोडा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादीने बारामती, रायगड, शिरूर, मावळ, बुलडाणा, नाशिक आणि महादेव जानकर यांच्यासाठी परभणी अशी मागणी केली आहे. लक्षद्वीपची जागा मिळाली असली तरी ती राज्यातील नाही, असेही या पक्षाचे म्हणणे आहे.(seat sharing maharashtra)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासमवेत असलेल्या सर्व खासदारांसाठी उमेदवारी मागितली असून औरंगाबाद आणि ठाणे या जागाही हव्यात, असे दिल्लीतील भाजप नेत्यांनाही कळवले आहे. खरे तर शिवसेनेने गेल्या निवडणुकीत लढवलेले सगळेच मतदारसंघ आम्हाला मिळायला हवेत, अशी या पक्षाची मागणी आहे. शिंदे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोरे जाणाऱ्या रामटेक मतदारसंघाबाबत लगेचच निर्णय घेतला गेला. भाजपतर्फे निवडणूक लढवण्यास तयार असलेल्या काँग्रेसच्या राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश करत ती जागा त्यांना देण्यातही आली.
त्यातच भाजपने जवळपास सर्व खासदारांना पुन्हा संधी दिल्याने धैर्यशील माने (हातकणंगले), सदाशिव लोखंडे (शिर्डी), संजय मंडलिक (कोल्हापूर) या तिघांनी आमची उमेदवारी निश्चित, असे सांगायला प्रारंभ केला. कृपाल तुमाने (रामटेक) यांनी माघार घेतली, तर भावना गवळी (यवतमाळ) शांत आहेत. गजानन कीर्तिकर खासदार असलेल्या मुंबईच्या जागेवर तर चर्चाही सुरू झालेली नाही.(gajanan kirtikar)
नाशिकची जागा दोन्ही मित्र पक्षांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करताच भाजपचे या जिल्ह्यातील संघटन मजबूत असल्याने आम्हाला संधी द्या, सांगायला तेथून आमदार देवयानी फरांदेंसह सर्व महत्त्वाचे नेते मुंबईत पोहोचले. कोल्हापूर, हातकणंगले येथे भाजप लढला तर जिंकण्याची जास्त संधी आहे, याकडे नेत्यांच्या चर्चेत दुर्लक्ष झाले की काय म्हणत कार्यकर्ते आग्रही झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरही भाजपने दावा केला आहे.
अखेर वादातील जागा तशाच ठेवत यादी घोषित करण्याचा निर्णय झाला. भाजपने २३ उमेदवार घोषित केले. वादविषय असलेल्या मुंबईत चार जागा लढवल्या तरी २७ म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा केवळ दोन जागा जास्त होतील; मग शिवसेना फुटली याचा फायदा काय, असा प्रश्न भाजपमध्ये चर्चेला आला आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर तोडगा काढू, असे सांगितले जात होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.