Navi Mumbai: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ बेशिस्त रिक्षा चालकांना नवी मुंबईत पोलिसांचा दणका
Navi Mumbai Crime: बेजबाबदारपणे रिक्षा चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे.
एकाच दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई क्षेत्रातील काही रिक्षाचालक हे वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले होते. तसेच अनेक प्रवाशांनी बेशिस्त रिक्षा चालविणाऱ्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहिमेला सुरुवात केली आहे.(Navi Mumbai Traffic Department)
या विशेष मोहिमेदरम्यान नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या १६ शाखांनी बुधवारी आपापल्या हद्दीत १३८ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे.
यापुढील काळातही रिक्षा चालकांविरोधातील कारवाई सुरूच रहाणार असल्याचे नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी स्पष्ट केले.
कोपरखैरणे, घणसोलीमध्ये काही रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे व त्यांच्या अंमलदारांनी दोन दिवस विशेष मोहीम राबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० पेक्षा जास्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. यात प्रामुख्याने प्रवासी भाडे नाकारणाऱ्या १७ रिक्षा चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली.(koparkhairne ghansoli)