Mumbai Loksabha: महायुतीच्या प्रचाराची धुरा फडणवीसांवर, आतापर्यंत घेतल्या तब्बल इतक्या सभा
Mumbai News| महायुतीला लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. यावेळी महायुतीत अजित पवार यांच्या रूपाने वेगळ्या विचारधारेच्या पक्षाचा समावेश झाला. त्यामुळे जागावाटप करताना तारेवरची कसरत करावी लागली. असंख्य बैठका, दिल्ली वाऱ्या, नाराजांची नाराजी दूर करण्यासोबत उमेदवारांसाठी सभा घेणे, या सर्व जबाबदाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती पार पाडल्या आहेत.
महायुतीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्यासह महादेव जानकर, सदाभाऊ खोत सहभागी झाल्यामुळे महायुतीचे बळ वाढले. मात्र, लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर जागावाटपाचे खरे आव्हान होते.
मुंबई, नाशिक, ठाणे, कल्याण, यवतमाळसह अनेक मतदारसंघांवर तिन्ही पक्षांनी दावे केल्यामुळे जागावाटपाचा तिढा वाढला होता. काही जागांवर माघार घेऊन, तर विजयाचे समीकरण बसवण्यासाठी काही ठिकाणचे उमेदवार बदलण्यास भाग पाडून देवेंद्र फडणवीस यांनी हा तिढा यशस्वीपणे सोडवला. त्यामध्ये काही जागा सोडल्यामुळे स्वपक्षाची नाराजीही त्यांना झेलावी लागली.
...
एकखांबी तंबू
एकीकडे जागावाटप सुरू असताना सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यासही देवेंद्र फडणवीस यांना जावे लागले. एकाच दिवशी दोन दोन मतदारसंघांत कार्यकर्ता मेळावा, रॅली त्यांना कराव्या लागल्या. सध्या राज्यात महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी सर्वाधिक मागणी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याखालोखाल फडणवीस यांना मागणी असल्याचे कळते. महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचाराची सर्व धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. पहिला आणि दुसरा टप्पा मिळून फडणवीस यांच्या एकूण ४४ सभा झाल्या. तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत १० जाहीर सभा त्यांनी घेतल्या. म्हणजे ३० एप्रिलपर्यंत त्यांनी ५४ सभा गाजवल्या आहेत.
व्यग्र दिनक्रम
निवडणुकीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीस हे केवळ पाच ते सहा तास झोप घेत असल्याचे कळते. त्यांना दिवसाचे १५ ते १६ तास कार्यरत राहावे लागते. सकाळी नऊ वाजता ते घरातून निघतात. तत्पूर्वी दोन तास ते नागरिक, कार्यकर्त्यांना भेटतात. त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. दिवसभरातील दौरे, प्रचार सभा, बैठका उरकल्यानंतर रात्री १०.३०पर्यंत आपल्या कार्यलयात थांबतात. त्यानंतर नियोजित राजकीय बैठकांना सुरुवात होते. राजकीय रणनीती आखण्यासाठी रात्रीच्या बैठका वाढल्या आहे. मध्यरात्री एक ते दोन वाजता त्यांचा दिवस संपतो. पुन्हा सकाळी आठ वाजता ते तयार असतात.
...
पुण्यात मुक्काम
लोकसभा निवडणुकीचा पहिला आणि दुसरा टप्पा देवेंद्र फडणवीसांसाठी खूपच व्यग्र ठरला. पहिल्या दोन टप्प्यांत रात्रीचा मुक्काम नागपुरात असायचा; पण मुंबईला जाऊन बैठका कराव्या लागायच्या. यावेळी राजकारणाची सूत्रे मुंबईऐवजी नागपुरातून हलली. मुंबईत भाजपचे मुख्यालय आहे; पण फडणवीस मात्र पुण्यातच मुक्काम करणे पसंत करतात. पुण्यातून राज्यभरात कुठेही तत्काळ जाणे शक्य असते. स्वतःचे शेड्युल सांभाळत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक सभेला उपस्थिती लावतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.