ठाणेकर गाठणार मेट्रोने दक्षिण मुंबई
मेट्रोने ठाणेकर गाठणार दक्षिण मुंबई
मध्य रेल्वेला मिळणार सक्षम पर्याय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मेट्रो ११ मार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या १६ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईकरांसाठी वाहतुकीचे सक्षम जाळे उभे राहणार आहे; पण ठाण्याहून मेट्रो चारने निघालेल्या ठाणेकरांना वडाळा स्थानकातून मेट्रो ११तून पुढे दक्षिण मुंबईपर्यंत प्रवास करणे सुलभ होणार आहे.
मध्य रेल्वे लाइफलाइन समजली जाते तर लोकलच्या घड्याळावर धावणारा चाकरमानी मुंबईचा आत्मा समजला जातो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थेट ठाणे, कल्याण, बदलापूर आणि कसारा- कर्जतपर्यंत हे जाळे पसरले आहे. कितीही जीवघेणा प्रवास असला तरी त्याला पर्याय नसल्याने दररोज लाखो प्रवासी जीव मुठीत घेऊन लोकलने प्रवास करतात. लोकलचा हा भार कमी करण्यासाठी मुंबई-ठाण्यात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यापैकी मेट्रो चार हा मार्ग वडाळा- घाटकोपर- ठाणे कासारवडवलीपर्यंत धावणार आहे. ठाण्यात या मार्गाची चाचपणी सप्टेंबरअखेरपर्यंत करण्याचे नियोजन असून त्या दृष्टीने काम सुरू आहे. त्यामुळे दशकापासून प्रतीक्षेत असलेल्या ठाणेकरांसाठी मेट्रो दृष्टिपथात आली आहे.
वर्षभरात ठाणे ते वडाळा असा प्रवास मेट्राने ठाणेकरांना करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना आता ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया व्हाया वडाळा आणीक स्थानक गाठणे शक्य होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)च्या नवीन भूमिगत मेट्रो लाइन ११ मार्गामुळे हा प्रवास साध्य होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील या मेट्रो मार्गिकेला दिला आहे. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या १६ किलोमीटर लांबीच्या पूर्ण भूमिगत मार्गिकेची उभारणी करण्यात येणार आहे. ही नवीन लाइन मेट्रो चार (वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली), अॅक्वा लाइन (लाइन ३- कफ परेड- बीकेसी- आरे जेव्हीएलआर), मोनोरेल आणि भायखळा आणि सीएसएमटीसारख्या उपनगरी रेल्वेस्थानकांना जोडली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना सहज प्रवास करण्यास मदत होईल, असा दावा प्राधिकरणाने केला आहे.
असा घडणार प्रवास
मेट्रो ११ मार्गिका वडाळा ते कासारवडवली मेट्रो चार मार्गिकेला जोडली जाणार आहे.
ठाणे ते गेटवे असा प्रवास करताना वडाळा येथील आणीक स्थानकात मेट्रो बदलावी लागेल.
दक्षिण मुंबईतून आलेल्या प्रवाशांना मेट्रो तीनवरील वडाळा स्थानकात उतरून नजीकच्या मेट्रो चार मार्गिकेच्या स्थानकावर गाडी पकडावी लागणार आहे.
ठाणे ते वडाळा जमिनीवरचा तर वडाळा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास भूमिगत होणार आहे.
कॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार, सीएसएमटी, वडाळा, शिवडी, रे रोडहून पश्चिमेकडे भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, जीपीओ, हॉर्निमन सर्कल, गेटवे ऑफ इंडियाजवळ अपोलो बंदर अशी स्थानके मेट्रो ११ची असणार आहेत. त्यामुळे मुख्य बाजारपेठ असलेले भेंडी बाजार, नागपाडा आणि मध्य रेल्वेवरचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसही मेट्रोने गाठता येणार आहे.
ठाणे पल्ल्याडच्याही आशा पल्लवित
भविष्यात ठाणे मेट्रोला भिवंडी, कल्याण आणि बदलापूर मेट्रो जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नोकरी-धंद्यासाठी मध्य रेल्वेचे धक्के खात मुंबई गाठणाऱ्या ठाणेपलीकडील प्रवाशांना लवकरच मेट्रोचा सक्षम पर्याय उपलब्ध होण्याची आशा पल्लवित झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.