ये आग कब बुझेगी? कल्याणकरांचा सवाल 

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)
कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)

कल्याण : कल्याण पश्‍चिममधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आज दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीतून धुराचे लोण कल्याण पश्‍चिममधील अनेक भागात पसरल्याने नागरिकांची श्‍वासकोंडी झाली. सतत लागणाऱ्या आगीमुळे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड पुन्हा एकदा चर्चेत आले असून, ये आग कब बुझेगी? असा सवाल कल्याणकर करीत आहेत. 

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीमधील प्रतिदिन 650 टन कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. या डम्पिंगची साठवण क्षमता संपली असली तरी पालिकेकडून सर्रास येथे कचरा टाकणे सुरूच आहे. त्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. त्यातच बुधवारी (ता. 29) दुपारी 1 वाजून 20 मिनिटानी डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याने पेट घेतला. हवेमुळे ही आग वाढत गेल्याने परिसरात धूरच धूर झाला होता.

या धुराचे लोण शिवाजी चौक, आग्रा रोड, आधारवाडी, खडकपाडा, टिळक चौक आदी परिसरात पसरले होते. अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला तर अनेकांचे डोळे चुरचुरत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केल्याची माहिती पालिका उपायुक्त उमाकांत गायकवाड यांनी दिली. 

डम्पिंग ग्राऊंडवर सतत लागणाऱ्या आगीने धुराचे लोण परिसरात पसरतात. त्यामुळे श्‍वसनाचे विकार, दुर्गंधी यामुळे अनेकांनी परिसर सोडला आहे. नागरिकांनी येथून मॉर्निंग वॉकही बंद केले आहे. वारंवार आंदोलन करूनही पालिका लक्ष देत नसल्याचा संताप येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. 

ना प्रश्‍न मिटला, ना वेतन रोखले! 

  • आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला वारंवार लागणाऱ्या आगीबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी मागील वर्षी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी आधारवाडी डम्पिंगवर उपाययोजना न केल्यास अधिकारी वर्गाचे वेतन रोखण्याची मागणी केली होती.
  • मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने ना डम्पिंगचा प्रश्‍न मिटला, ना अधिकारी वर्गाचे वेतन रोखले, असा आरोप घाणेकर यांनी केला आहे. कल्याण पश्‍चिमेस येणारा अन्य ठिकाणांचा कचरा तातडीने बंद होणे गरजेचे आहे. पूर्ण शहराचा कचरा कल्याण पश्‍चिमेतच का टाकला जातो? जिथे निर्माण होतो तिथेच कचरा निर्मूलन होणे गरजेचे असल्याचे मत घाणेकर यांनी व्यक्त केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com